Wednesday, September 29, 2021

मुक्ती - राणी भाग नऊ

      राणी वडील गेल्या पासून थोडी शांत झाली झाली होती. तिला सारखी आई आणि वडील यांची आठवण यायची. वडिलांचे विक्षिप्त वागणे आई चा आजार. सम्पूर्ण कुटुंबाची होणारी परवड. उपाश्यापोटी ते काढलेले दिवस. सारच तिला आठवायचं. मग ती अजूनच अस्वस्थ व्हायची. वडील का तसे वागत होते. याचे ती उत्तर शोधायचा प्रयत्न करायची. पण ते एक नेहमीसाठी तिच्यापुढे प्रश्नचिन्ह होऊन पुढे राहायचे. कोणी काही सांगेल का ते तसे का होते. जर ते तसे होते तर मरताना इतके प्रेमळ मायाळू का वागले. का आपली इतकी आठवण करत होते. आपली भेट होईपर्यंत ते कुठली आस मनात ठेवून ते जिवंत होते. आपली भेट होताच आपल्या मांडीवरच त्यांनी का प्राण सोडले. विविध प्रश्न तिच्या डोक्यात गुंता करत होते. उत्तर तिलाही माहीत नव्हते. आई ही तिच्याशी बा बद्दल कधीच काही बोलली नव्हती. आई आणि बा कधीच त्याना तिने सोबत बसून बोलताना बघितले नव्हते. बा फक्त झोपायला तेवढा घरी यायचा. सकाळ होताच निघून जायचा. परत यायचा तो दारूच्या नशेतच असायचा. का तो असे करायचा. राणीला काहीच कळत नव्हते, सुचत नव्हते.
तिने आपल्या मनातले सारे प्रश्न नाईकांकडे मांडले. नाईकांनाही ते एक कोडेच वाटले. त्यानी राणीला समजवायचा प्रयत्न केला. ते म्हणाले. राणी विसर आता सगळं. त्यांचं आयुष्य ते जगलेत. तुझ्यापुढे आता भविष्य आहे. ते तू आनंदात काढ. तसेही ते दोघेही आता जिवंत नाहीत तुला उत्तर द्यायला. का स्वतःला असा ताप करून घेतेस. आठवण येणे तर स्वाभाविकच आहे परंतु, सारखा तोच तो विचार करणे बरे नाही. तू स्वतःच आजारी पडली तर मग आमच्याकडे कोण बघणार. खरच आता तू ते सगळं विसरून जायला हवे. नाईकांचे ते बोलणे राणीलाही सुटायचे. ती मग त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्नही करायची. पण जेव्हा ती एकटी असायची तेव्हा तिला तो तिच्या बा चा शेवटचा क्षण आठवायचा आणि मग ती त्या सगळ्या विचारात गुरफटून जायची.

       बा च्या तेराव्या दिवसाला तिने नैवेद्य काढून गाईला अर्पण केला. पूजा केली. नाईकांनी काही वस्तू आणून ठेवल्या होत्या त्या साऱ्या वस्तू ती त्या राहत असलेल्या गरिबांना वाटायला घेऊन जाणार होती. नाईक त्यासाठी आज ऑफिसमधून लवकर घरी परत येणार होते. ती नाईकांची वाटच बघत होती. तेवढ्यात नाईक आलेत. दोघेही मिळून ते साहित्य घेऊन तिच्या त्या घराच्या भागात पोचले. त्यांनी घरोघरी जाऊन  सगळ्या वस्तू तिथल्या लोकांना वाटून दिल्या. बा चा निरोप घेऊन येणारे ते गृहस्थही तिला भेटले. तिने त्यांना कधीतरी वेळ मिळेल तेव्हा घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि ते दोघेही घरी परत आले.

       आज तिला थोडे बरे वाटत होते. ती तिकडे राहत असताना तिथल्या लोकांनी तिच्या बा आईला जी मदत केली होती. तिला तिथे जे प्रेम मिळाले होते त्याची परतफेड तर शक्य नव्हती, पण तिनेही त्यांच्यासाठी काही केल्याचे समाधान तिला वाटत होते. तिथे राहणारी सगळीच कुटुंब गरीब रोज दिवसभर कष्ट करून पोट भरणारी होती. त्यामुळे त्यांना दिलेल्या त्या वस्तू त्यांच्या कामात येणार होत्या.  तिचे सम्पूर्ण बालपण तिथल्या त्या लोकांच्या सानिध्यातच गेले होते. तिथले लोक सगळे गरीब जरूर होते. पण वाईट बिलकुल नव्हते. त्यानाही आपला आत्मसन्मान खूप मोठा वाटायचा. त्यासाठी ते स्वतःला खूप जपत होते. तेच संस्कार राणी ला मिळाले होते . कष्ट इमानदारी आणि आत्मसंमान सगळेच गुण राणीने  पूर्णतः अंगिकारले होते.स्वभाव तर मुळातच तिचा शांत,साधा, सरळ, सालस होता. नाईकांना म्हणूनच राणी आवडत होती.

      हळू हळू दिवस जात होते. आता राणीही आई वडिलांचे दुःख विसरत होती. घरात कामाच्या व्यापात तिचा वेळ कसा निघून जायचा ते तिला कळत नव्हते. नाईक आणि मूलं ही आता राणी सोबत छान मिक्स झाले होते. आता सगळे व्यवस्थित सुरू होते. असेच एक दिवस सायंकाळी सगळे आनंदात गप्पा करत होते. तेवढ्यात दरवाजावर खटखट झाली. राणीने दरवाजा उघडला तर तेच गृहस्थ दारात उभे होते. त्यांनीच राणीच्या वडिलांचा शेवटचा निरोप आणला होता. तोवर नाईकही दारात आले. नाईकांनी त्याना घरात बोलवले.  राणी त्यांच्या साठी चहा ठेवायला आत गेली. नाईकांनी त्यांना बसवले आणि येणाचे कारण विचारले. त्यांनी सांगितले काही कामा निमित्त ते त्या भागात आले तर राणी ची आठवण झाली म्हणून सहज आल्याचे सांगितले. नाईक त्यांच्या सोबत गप्पा करत होते. तेवढ्यात राणी त्यांच्याकरिता चहा घेऊन आली. त्याना राणीला बघून बरे वाटले होते. मग राणीनेच    त्यांना विचारले काका मला एक प्रश विचारायचा होता.  विचारू की नको सुचत नाही आहे. मला विचारायचे होते की माझे बा असे का वागायचे ते घरी कधीच नव्हते बोलत फक्त रात्री यायचे आणि सकाळी निघून जायचे असे का करत होते ते.  आणि आई  माझ्यावर खूप प्रेम करायची पण बा त्याने कधीच माझ्यावर प्रेम केले नाही कधी बोलत पण नव्हता. पण अंत समयी काय झाले की तो मला आयुष्यभरासाठी आशीर्वाद देऊन गेले.

      राणीचा प्रश्न ऐकून त्या गृहस्तांचे डोळे पाणावले. राणी बेटा तू एक वर्षाची असतानाची गोष्ट असेल. बेटा तुझी एक बहीण होती. ती तुझ्या पेक्षा मोठी होती दोन वर्षांनी. तुझे बा चांगल्या नोकरीत होते. घर दार सगळंच चांगलं होत. पण एक दिवस तुझे बा तुझ्या बहिणीला घेऊन कुठे बाहेर निघाले होते. ती त्यांचा हात पकडून चालत होती. पण अचानक तिने त्याचा हात सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या फुगे वाल्याकडे धाव घेतली आणि नेमक्या त्याच वेळी येणाऱ्या बस ने तिला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तुझ्या बा ला त्याचे खूप दुःख झाले इतके की त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्या दिवसापासून तो कधीच एकही शब्द बोलला नाही. त्याची वाचाच गेली. नोकरी गेली पैसा सम्पला. मग ते इकडे आमच्या भगत रहायला आले. या दोन्ही घटनांचा तुझ्या आईवरही फरक पडला ती पण आजारी राहायला लागली. तरी त्या माउलीने सगळे सांभाळले. तुला मोठे केले. तुझा बा बघ संतुलन गमावलेले असतांनाही शेवटी मात्र त्याला तुझी आठवण झाली आणि घरी परत आला. सारखे तुला आठवत राणी राणी करत होता. बेटा बरेच झाले. तू येऊन त्याला जवळ घेतलंस. मुक्त झाला तो या जन्मतून. नाही तर त्याचा आत्मा तुझ्यासाठी भटकत राहिला असता.

       ती गोष्ट ऐकून राणी खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यातून आसवे गळत होती. बराच वेळ झाला होता. ते काका आता निघून गेले होते. राणीला आता खूप बरे वाटत होते कारण तिचे बा या जन्मतून मुक्त झाले होते.
Sanjay R.




No comments: