Saturday, October 31, 2020

" एकटा "

सोबतीला असतो कोण
एकटेच यायचे इथे ।
जोडायचे मग एकेकाला
कसे जुळते नाते तिथे ।

रोज एक नवा दिवस
काय ध्येय काय कुठे ।
क्षण क्षण सरतो पुढे
मागे मागे सारे सुटे ।

पोटासाठी परिक्रमा
घामासोबत रक्त आटे ।
शेवटी हातात शून्य
रास्त्यावरती सारे काटे ।
Sanjay R.


" बळीराजाचे दुःख "

सगळेच म्हणतात मला
आहेस तू बळीराजा ।
भोगतो मात्र दुनियेची
दुःख हीच माझी सजा ।

फाटक तुटकच नशिबात
राहतो नेहमी अंधारात ।
अख्ख आयुष्य गेलं बघा
निरंतर असतो कष्टात ।

आडोशाला भिंती चार
वर फाटक तुटक छप्पर ।
शिक्षण पाणी पण शून्य
पोरही निघाले सारे टिप्पर ।

आशा मात्र सुटत नाही
उपसतो कष्टाचा डोंगर ।
एकच पाऊस देतो धोका
फिरते मेहनतीवर नांगर ।

लुटारू तर सांगू किती
खिसा भरतो व्यापारी ।
कर्ज काढूनच जगतो मी
झकास चालते सावकारी ।

राजकारण्यांच काय सांगू
देऊन जातात आश्वासन ।
शेतकऱ्यांचा नाही कोणी
काय करते सरकार पन ।

रडत फडत जातो दिवस
कुठला आला दिवाळ सण ।
नशीबाचाच फेरा आहे
हेच आमचे जीवन मरण ।
Sanjay R.


Friday, October 30, 2020

" दसरा दिवाळी "

     आज दसरा आहे, पण वाटतच नाही दसरा आहे म्हणून, मन अशांत होतं. उठल्या बरोबर गाडी धुवायला घेतली. हेच आजकाल प्रमुख वाहन झाले होते. त्याची आज पूजा करायची होती. सकाळीच तयार होऊन बाजारात गेलो, अगदीच तुरळक दुकानं थाटली होती. झेंडूची फुलं आणि सोन पण विकायला होत.

     म्हटलं चला सोनं घेऊ या. सायंकाळ आज मस्त जाईल, थोरामोठ्यांना सोनं देऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. नेहमीसारखीच वर्दळ होईल. सगळ्यांच्या गाठी भेटी होतील. सगळ्यांचा हाल अहवाल मिळेल. सायंकाळ कशी मस्त जाईल.
झेंडूची फुल, सोनं, आंब्याची पानं आणि इतर काही वस्तू घेऊन घरी आलो. बसून छान झेंडूच्या फुलांचे हार तयार केले. त्यात हिरवी हिरवी आंब्याची पानं घातली. मनात उत्साह भरला. दाराला तोरण लावले हार चढवला. गाडीला पण एक हार चढवला. देवाच्या फोटोला हार घातले. घरातले होते नव्हते सारे शस्त्र म्हणजे खल बत्ता, कांदे कापायची पावशी, काढले, मस्त धुवून त्यांना देवासमोर मांडले आणि शस्त्र पूजा केली. आजकाल शस्त्रपूज या शस्त्रांचीच होते, तलवार भाले बिचवे उरलेच कुठे. आणि आम्ही कुठे रणांगणात लढाईला जाणार. घरात कांदा कप्तान होते तीच आमची लढाई. किती अश्रू निघतात तेही करताना.  कधी कधी तर डोळे पण सुजतात या खोट्या रडण्याने.

     घरात पुरी भाजी चा बेत सुरू होता. नैवेद्याला गोड म्हणून खमंग तुपातला शिरा भाजने सुरू होते. तो सुगंध हवा हवासा वाटत होता. दुपारी देवाला नैवेद्य करून जेवण आटोपले. आणि आरामात घर सजवायला घेतले. सगळ्या वस्तू व्यवस्थित धुवून पुसून जागच्या जागी ठेवल्या. थोडी स्वच्छता केली. सायंकाळी लोक येतील. सगळं कसं टाप टीप दिसायला हवं. करता करता बराच वेळ गेला. 
सीमोलंघनाला जायची वेळ झाली. थोडे नवीन असलेले कपडे घालून तयार झालो. कपाटात ठेवलेला परफ्युम काढला. दोनदा तीनदा अंगावर उडवला. सुगन्ध छान येतोय याची खात्री करून घेतली. थोडा घरात पण शिपडला. सगळे घर सुगनदीत झाले होते.  मधेच बायको बोलून गेली. अहो हे कशाला मारलं, आता माझं डोकं दुखणार, तुम्हाला माहिती आहे ना मला याची एलर्जी आहे ते. तरी मी ते आलमारीत लपवून ठेवले होते. तिथे पण तुम्ही शोध लावलाच. मी थोडा खजील झालो. पण म्हटलं अग आज दसरा सो उत्साह भरायला नको का. आजच्या दिवस चालवून घे. पंखा चालू करतो. थोड्या वेळात कमी होईल सुगन्ध. तुला त्रास नाही होणार.

     बायकोला सांगून मी बाहेर पडलो
सीमोल्लंघनाला... कुठे जायचे काहीच ठरवले नव्हते. बाहेर रस्त्यावर आलो तर गर्दी खूपच तुरळक दिसत होती. सगळे कदाचीत घरी परतणार असावेत. दरवर्षी सीमोल्लंघनाला जाणारी ती गर्दीच नव्हती. सगळं कसं शांत शांत भासत होतं. तरीही मी आपला चालत राहिलो. तसाच चालत चालत गावाच्या बाहेर पोचलो होतो. माणसांचा अगदी शुकशुकाट वाटत होता . सूर्यही परतीला पोचला होता. दरवर्षी लागणारी खेळण्यांची दुकानं लहान मोठ्यांची गर्दी काहीच नव्हतं. रावण दाहनही कुठेच दिसले नाही. यंदा रावणाला आनंद झाला असणार . मी तसाच परत घरी पोचलो.
आता थोडा अंधार पडला होता. घरात येताच हात पाय धुवून देवाला नमस्कार केला. पाहिले सोने देवाला द्यायचे या नियमाने देवाला सोने दिले. नमस्कार केला. बायकोनेही मला सोने दिले. नमस्कार करून आता सगळ्या बाहेरच्या थोरामोठयांना सोने द्यायला आपण मोकळे, म्हणून हॉल मध्ये आलो. आई बाबांची आठवण येत होती. दरवर्षी त्याना सोनं द्यायचो आणि ते भरभरून आशीर्वाद द्यायचे ते आठवलं. ते जाऊन आता चार वर्षे झाली होती पण आठवण मात्र सुटत नव्हती. आठवण आली की सगळं आठवायचं. आपलं लहानपण ते मोठं होईस्तो त्यांनी आपली घेतलेली काळजी, त्यांचे लाड प्रेम आणि कौतुक. आता त्यातलं काहीच उरलं नव्हतं.  मन हळवं झालं. बायकोनेही माझ्या मनात काय चाललं ते ओळखलं . आणि तीही हळवी झाली. वातावरण आनंदी व्हावं म्हणून ती बोलली चला आता लोकं येतील. थोडा चेहरा मोहरा बदला. थोडे आनंदी दिसा. चला तयारी करा आता.

आम्ही दोघेही तयार झालो आणि वाट भट बसलो सोनं वाटायची. बराच वेळ निघून गेला पण यंदा कोणीच कोणाकडे सोनं द्यायला आलं नाही की गेलं नाही. मग आम्हीही कपडे बदलून घेतले. मधेच बायको विचारून गेली जेवण करणार का. जेवायचाही मुडच गेला. नको वाटत होतं. मग तशेच झोपायला गेलो.

     शेवटी बायकोच बोलली हे पूर्ण वर्षच कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं. सगळं आयुष्यच थांबवलं. माहीत नाही कधी जाणार हा कोरोना.
ना दसरा ना दिवाळी... घ्यायची फक्त कोरोनीलची गोळी . जाऊ द्या जातील हेही दिवस.. आणि मग परत एकदा सगळे आनंदी होतील...

संजय रोंघे
नागपूर


" स्पर्श मायेचा "

हळूच मोहरून जातो
हळुवार स्पर्श मायेचा ।
होते मन भीर भीर 
आठवतो पदर आईचा ।

अजूनही आहे अंतरात
भरलेला गंध जाईचा ।
ओढ कशी वासराला
हंबरडा चाले गाईचा ।

माया ममता प्रेम सारे
स्पर्श एकच सुखाचा ।
फिरता हात पाठीवरती
सरतो लवलेश दुःखाचा ।
Sanjay R.

Thursday, October 29, 2020

" समाधान "

स्वभावच माणसाचा असा
नसतो कधी समाधानी ।
म्हणतो मी काय कमी
दिखावा नुसता स्वाभिमानी ।

अज्ञानाचा असूनही सागर
सांगे मीच मोठा ज्ञानी ।
माणूसच तो माणसासारखा
त्याच्यासारखा नाही कोणी ।
Sanjay R.



Tuesday, October 27, 2020

" आयुष्य आहे रस्ता "

आयुष्य आहे रस्ता
मनुष्य एक प्रवासी
अखंड चाले प्रवास
नाही कोणी निवासी 

जगतो आम्ही सारे
जग हे आभासी ।
अस्तित्वाची लढाई
खेळ चाले जीवाशी ।

स्वप्न उरात किती
खेळ चाले मनाशी ।
थकून भागून निजतो
ठेवतो बांधून उशाशी ।
Sanjay R.

Monday, October 26, 2020

" सुखी आयुष्य "

मनाला कुठले सुख
त्याला तर असते हाव ।
हे हवे ते हवे सारेच हवे
सुरू असते धावाधाव ।

कधी म्हणतो देवाला
एकदा मला पाव ।
पावलाच कधी तर
घेत नाही परत नाव ।

आयुष्य जाते असच
नुसता जीवाला काव ।
सरते शेवटी मात्र मग
बसतो कुरवाळत घाव ।

कधी सुख कधी दुःख
हेच जीवनाचे नाव ।
वेळ काढून थोडा
जीवाला जीव लाव ।
Sanjay R.


Saturday, October 24, 2020

" ध्येय काय या जीवनाचे "

जगणे मरणे नाही हाती
ध्येय काय या जीवनाचे ।

दिवस रात्र चाले अभ्यास
असते खूप खूप शिकायचे ।

नोकरीसाठी झिजते चप्पल
सांगा किती धडपडायचे ।

नोकरी व्यापार कुठे आधार
कष्टच करून मग जगायचे ।

चाले सदाचा एकच संघर्ष
मलाही तुमच्यात बसायचे ।

दिवसामागे दिवस जातात
राहूनच जाते मागे हसायचे ।

कळतच नाही सरते सारं
सांगा नाही मला हो मरायचे ।
Sanjay R.

Friday, October 23, 2020

" हळवं नातं "

असेल नातं हळवं
पण आहे ते दृढ ।
मनात असते तगमग
पण नसतो त्यात सूड ।

घेतो मी सांभाळून
वार कितीही झाले ।
विसरायला काय लागतं
चुकते कधी आपले ।

चुकभुल देणे घेणे
दोन बाजूंचे नाणे ।
संसार हा असाच
गातो कधी रडगाणे ।

प्रेमाला कुठला बंध
विचारच होतात बेधुंद ।
क्षण दुखाचाही येतो
शोधू त्यातही आनंद ।
Sanjay R.


" आठवण मनातली "

मनात किती आठवणी
जपतो एक एक मणी ।

आयुष्याचा क्षण प्रत्येक
सांगा टिपला तेथे कोणी ।

एकांतात होते मज याद
मनाचा आहे मी ऋणी ।

आठवण देते कधी आनंद
तर कधी डोळ्यात पाणी ।

व्यथित जेव्हा होते मन
तेव्हा मन मनाला जाणी ।
Sanjay R.

Thursday, October 22, 2020

" स्त्री शक्ती "

दे जरा सन्मान तू
या स्त्री शक्तीला ।
कर विचार थोडा
सांगा त्या व्यक्तीला ।
करू नको अन्याय
विचार तू मनाला ।
कोण ही नारी
विसरलास का आईला ।
हो जागा थोडा 
बघ तुझ्या बहिणीला ।
उभी बाजूला तुझ्या
सांग तू पत्नीला ।
झाली मोठी थोडी
बघ तुझ्या मुलीला ।
नाते असो कुठलेही
स्थान हृदयात प्रेमाला ।
प्रत्येक रुपात दिसेल
कर तू नमन देवतेला ।
दुर्गा अंबा जगदंबा
भय तिचे राक्षसाला ।
 होऊन निडर लढते 
करतो सलाम शौर्याला ।
नारी तूच आहे महान
नाही शंका कोणाला ।
नतमस्तक आम्ही सारे
आधार तुझा जीवनाला ।
Sanjay R.

Wednesday, October 21, 2020

" नवरात्री उत्सव "

नवरात्री महोत्सव आहे सुरू
वाटतं मला काय काय करू ।

आठवते मला देवळतली गर्दी
जाता येत नाही होईल सर्दी ।

चौका चौकात देवीची आरास
निघताच येत नाही होतो त्रास ।

मनात होतं यंदा दांड्या खेळायचं
घरातल्या घरात कसं नाचायचं ।

बघा जरा आलेत कसे हे दिवस
सम्पू दे कोरोना मी करतो नवस  ।

दिवाळी दसरा येइल पुन्हा परत
वर्ष हे यंदाचे आलेच आता सरत ।
Sanjay R.


Monday, October 19, 2020

" लगन पायतो करून "

गण्या आमचा लय भारी
म्हने लगन पायतो करून ।
पोरगी रावबाची दिसते हेमा
म्हने आनतो तिले धरून ।

घर हाये लहान पन
लगन झाल्यावर चालन ।
मायले सुख भेटन
आन बा ले आयतं जेवन ।

मलेबी होईन थोडी मदत
थोडं कामबी थे करन ।
मलेच भरा लागते पानी
थे बी थे भरन ।

माय म्हने मोठा आला तू
बायको तुई काय काय करन ।
एवढं काम करून बापू
पोरगी जगन का मरन ।

सून माई कवतीकाची
लय लाडाची थे आसन ।
मीच करीन काम आनं
थे गोष्टी करत बसन ।

हरिक आला गण्याले
मायचं बोलन आयकून ।
म्हने कराचंच आता लगन
देऊ अमदा धडकून ।
Sanjay R.

" रथ संसाराचा "

निघतो रथ संसाराचा
त्याला असती चाके दोन ।
चाले रथ रोज पुढे पुढे
खाच खळगे कुठे कोण ।

लक्ष असते जीवनाचे
विश्वास असतो विजयाचा ।
जय पराजय बाजू अनेक
उत्सव होतो आनंदाचा ।

डोकावून जाते दुःख कधी
विचार त्याचा नसतो मनी ।
प्रयत्नांची मग होते शर्थ
दूर होतात सारे शनी ।

फुलते मग बाग फुलांची
पाखरं होती दोन पक्षांची ।
दिवसामागून दिवस जाती
अविरत चाले चाकं रथाची ।
Sanjay R.

Sunday, October 18, 2020

" नारी स्तवन "

चला करू आपण सारे
आज अनोखी वारी ।
काय महत्व जीवनात या
सांगतो तुझे ग नारी ।

पाठ पंढवते संस्कारांचे
आहेस किती तू विचारी ।
शिक्षित करते घर सारे
घरची शान आहे नारी ।

माणूस म्हणे मी कामी
असेल रिकामा तो जरी ।
भार उचलते स्त्रीच सारा
असू दे कितीही भारी ।

घेऊन ती अचूक निर्णय 
देई आनंदाची फेरी ।
नारी विना तर होईल काय
जगत जननी तू भारी ।

अंबा जगदंबा लक्ष्मीही तू
पूजन होई घरो घरी ।
विरांगणेची गाथा तुझीच
स्तवन करतो सारी ।
Sanjay R.

Saturday, October 17, 2020

" शोधतो मी मला "

शोधतो मी मला
दिसलो का कुणाला ।
आहे कुठे मी सांगा
विचारले माझ्या मनाला ।

ब्रह्मांड हे केवढे
व्यापले कण कण इथे ।
पाताळ धरती आकाश
अनंत विशाल जिथे ।

ग्रह तारे आणि नक्षत्र
जीव सजीव निर्जीव ।
दृश्य कोणी अदृश्य
सीमा नाही आजीव  ।

परिक्रमा या जीवनाची
संपता कधी संपेना ।
अविरत चाले शोध
कोणी कुणास मिळेना ।
Sanjay R.

Friday, October 16, 2020

" रोजनिशी "

काय लिहिणार रोजनिशी
जीवनच आपले भंगार ।

अजुबाजूला बघतो जेव्हा 
पेटतो मस्तकात अंगार ।

जिकडे तिकडे सावळा गोंधळ
पेटते दहशतीची चिंगार ।

माणुसकीच उरली नाही
फक्त माणसं इथे रंगणार ।
Sanjay R.

Thursday, October 15, 2020

" इच्छा होईल साकार "

इच्छा हा असा प्रकार
मन देई त्यास आकार ।
सोडूनि सारे विकार
करा इच्छेस साकार ।

इच्छा करवी विचार
तद्वत बदले आचार ।
कोणी होई लाचार
अंगी कुणाच्या संचार ।

करु या सहज वार
लागेल नौका पार ।
कुठे कुठला सार
बस इच्छे वरती मार ।

नका पत्करू हार
नव्हे जीवन भार ।
करु संकटावर प्रहार
पुरे छोटासा आधार ।
Sanjay R.




" दृढ इच्छा "

मनात उठलेले वादळ
असते ती इच्छा ।
करते सदा पाठलाग
सोडत नाही पिच्छा ।
शक्ती तिची अपार
असो नसो सदिच्छा ।
पूर्ण होता विसावे

फुले अंतरात गुच्छा ।

Sanjay R.



Tuesday, October 13, 2020

" स्वप्न देख भाई देख "

मनात स्वप्न अनेक
पूर्ण होईना एक ।
दिवसरात्र रंगवितो
असतात सारेच फेक ।

सुख दुःखाचा मेळ
विचारांचा अतिरेक ।
जगतो स्वप्नच माझे
देख भाई देख ।
Sanjay R.

" कवितेची निवड "

यवतमाळ साहित्य मंच द्वारा आयोजित काव्य स्पर्धेत माझ्या नाती गोती या कवितेची निवड, आयोजकांचे खूप खूप आभार .

" नाती गोती "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

लुटारूंचा बोल बाला
भोगवाद्यांचा अजब न्याय ।

कष्टकऱ्यांचे आटते रक्त
सहन करतो सारे अन्याय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.

Monday, October 12, 2020

" सावली तू "

तू जिथे मी तिथे
तुझ्याविना कोण कुठे ।
डोळ्यात तू अंतरात तू
शोधतो तरी आहे कुठे तू ।

स्वप्नात कधी साक्षात तू
असूनही जवळ दूर किती तू ।
दुःखात तू आनंदात तू
आहेस माझ्या जीवनात तू ।

सुगंध तू बेधुंद ही तू 
प्रत्येक माझ्या श्वासात तू ।
आशा तू आकांक्षा तू
पूर्णत्वाची तर भावना तू ।

बांधले नात्यात ती गाठ तू
उभी मागे माझ्या पाठ तू
होतेस कधी माऊली तू
सोबती माझी सावली तू ।
Sanjay R.



Saturday, October 10, 2020

" उरते मनात इच्छा "

इच्छा मनात अनेक
बघतो स्वप्न त्यांचे ।
होती पूर्ण सारे
सारे आभास मनाचे ।

दूर जळतो दिवा
प्रकाश लखलख त्याचा ।
अंतरात जळते मन
संदर्भ त्यास कुणाचा ।

जग जिंकावे ही इच्छा
देईल कोण सदिच्छा ।
रात्र असते भयाण
स्वप्न करते पिच्छा  ।

स्वप्ना विनाची रात्र
मोडून झोप जाते ।
निज निज करतो मनात
स्वप्न सोडून जाते ।

उरते मनात इच्छा
सांगू कसे कुणाला ।
सोडून सारेच जायचे
मन समजावी मनाला ।
Sanjay R.


" लागलो शेवटी मार्गाला "

एकटाच होतो चालत
विराण त्या रस्त्यावर ।
नव्हते मागे पुढे कोणी
रस्ताच उठला जीवावर ।

झाडं झुडपं पशु पक्षी
गेलेत कुठे नव्हते माहीत ।
मात्र सूर्य होता डोक्यावर
अंग अंग माझे जळीत ।

वाटले रक्त गेले सुकून
पडली कोरड घशाला ।
वाटे मृगजळ पुढेच आहे
धावलो मीच कशाला ।

रस्ता सरता सरत नव्हता
धाप लागली श्वासाला ।
धडपडलो थोडा अडखळलो
लागलो शेवटी मार्गाला ।
Sanjay R.

Friday, October 9, 2020

" मुंबई स्वप्नांचे शहर "

मुंबई तर माझी
वाटे स्वप्नाचे शहर ।
कामासाठी भटकतो
थांबत नाही नजर ।

चकचकीत रस्ते आणि
लकलकीत गाड्या ।
नजर जाईल तिकडे
उंचच उंच माड्या ।

रस्त्यावर चालताना
किती माणसांची गर्दी ।
शोधली तर सापडेल
लोकलमध्ये अर्धी ।

वेळ नाही कुणास
जो तो घाईत ।
जातात सारे कुठे
नाही कुणास माहीत ।

एका कडेला समुद्र
फेकतो कशा लाटा ।
नेहमीच भरलेल्या
आहेत तिथल्या वाटा ।

जिथे तिथे खायला
वडा पाव भेळ ।
चालता चालता खातील
जेवायला नाही वेळ ।

जिकडे तिकडे दिसेल
श्रीमंती चा थाट ।
झोपडीत जाल तर
झोपायला नाही खाट ।

घर म्हणता कशाला
एका खोलीत संसार ।
आयुष्य भर पळतो
तरी पेलवत नाही भार ।

मुंबई शहर माझे
स्वप्न बघतो जीवनभर ।
दिवसामागे दिवस जातात
प्रवास चाले आयुष्यभर ।
Sanjay R.



Wednesday, October 7, 2020

" खेळ जादूचे "

आठवतं मला ते 
बघायचो जादूचे खेळ ।
रस्त्याच्या कडेला
जादूगार बसवायचा मेळ ।

वाजवून डमडम डमरू तो
हात आकाशात फिरवायचा ।
काढून पुष्पगुच्छ जादूने
भेट माकडाला करायचा ।

हसून हसून दुखायचे पोट
बघून चेष्टा माकडाच्या ।
जादूच ती सरली आता
माणूस मागे माणसाच्या ।
Sanjay R.

" डोळे बंद "

आंधळे प्रेम
डोळे बंद ।
फुलते जेव्हा
मन होते बेधुंद ।
गती श्वासांची
होते मंद ।
तुटतात सारे
जखडलेलेले बंध ।
अंतराला एक
अनोखा छंद ।
प्रेम हे असेच
असते अंध ।
Sanjay R.


Monday, October 5, 2020

" होऊ नको निराश "

होऊ नको निराश
नैराश्य म्हणजे विनाश ।

बघ थोडे आकाश
होईल परत प्रकाश ।

कठीण जीवन प्रवास
हवा विजयाचा प्रयास ।

मनात असेल जर ध्यास
विजयी होतील आभास ।
Sanjay R.

Thursday, October 1, 2020

" स्त्री अत्याचार "

हाथरस असो वा आमच्या विदर्भातील हिंगणघाट असो, स्त्री वर अत्याचार करणारी ही विकृती प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात, देशाच्या सम्पूर्ण भागात दिसून येते. अपराध्याना जात पात धर्म याच्याशी कुठलेच देणे घेणे नसते. ते आपली वासना पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार होतात. याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे ,त्यांना कशाचीच न उरलेली भीती. यासाठी शासनद्वारा कठोर कायद्याचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. जो पर्यंत आमच्या देशातील महिला या विरुद्ध पेटून उठणार नाहीत तोवर यावर नियंत्रण अशक्य वाटते. हाथरस येथील घटनेवर देशभर आंदोलन होत असतानाच देशाच्या इतर अनेक भागात अशाच घटना घडत आहेत. यातून   हे अत्याचार करणारे विकृत लोकांना कदाचित भीती उरली नाही हेच दिसून येते. आणि राजकारणी मात्र अशा मुद्द्यावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेताना दिसते.
यासाठी समाजानेच जागृत होण्याची गरज आहे.
" जय हिंद जय भारत "

" नाती गोती "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

लुटारूंचा बोल बाला
भोगवाद्यांचा अजब न्याय ।

कष्टकऱ्यांचे आटते रक्त
सहन करतो सारे अन्याय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.