Thursday, December 31, 2020

" घड्याळ जीवनाचे "

कशाला हवे घड्याळ
आहेच कुणाला वेळ ।
जगताय ना जीवन
बसवा त्याचाच मेळ ।

बघा हा कोरोना
केला सगळाच खेळ ।
शिकलो म्हणतात किती
सगळीच तर होती भेळ ।

सोशल डिस्टनसिंग 
स्यानिटायझर शब्द न कळे ।
आपलेच गेलेत सोडून
अश्रूंनी ओले डोळे ।

वर्क फ्रॉम होम करा
लावा घराला टाळे ।
बंदिस्त होते श्वास
आत्माही कसा तळमळे ।

नोकरी धंदे किती बुडाले
उपाशी पोटात खळे ।
घर घर करत निघाले सारे
कोण कुणासाठी हळहळे ।

नवीन वर्ष येतंय आता
दिवसा मागून दिवस पळे ।
स्वछंद होऊन जगायचे आता
जुन्या वर्षाचे नकोच लळे ।
Sanjay R.


Wednesday, December 30, 2020

" नको आता एकांत "

घराबाहेर निघायचे
खूप झाला एकांत ।
कोरोना ने केला
जगण्याचा अंत ।

परत येतो म्हणे
परत मनात खंत
जगू दे ना आता
नको जीवन संथ ।

कुठला कोरोना
काय त्याचा पंथ ।
दूर हो ना आता
राहा तूच निवांत ।
Sanjay R.

Tuesday, December 29, 2020

" तू नसतांना "

नकोच ही कल्पना
नको हा विचार ।
फक्त तू आणि मी
हाच एक आचार ।

थोडं तू लाजावं
वळून मी बघावं ।
गालात तू हसावं
आणि थोडं रुसवं ।

वाट ही आयुष्याची
मिळून दोघे चालावे ।
क्षण सुख दुःखाचे
मिळून दोघात वाटावे ।
Sanjay R.


Monday, December 28, 2020

" श्रद्धा आणि विश्वास "

सांग माणसा तू जरा
तुझ्या जीवनाचे काय मोल
ढळू नको रे हा असा
सांभाळ जरा तू तोल ।

भरला बाजार कसा हा
मिरवण्यास तुज हवा ढोल ।
शब्द तुझे बाण विषारी
लक्षणांचा तू कर विचार खोल ।

आचार तुझे रे लयास गेले
झाले आयुष्य तुझे रे गोल ।
श्रद्धा सबुरी आणि विश्वास
विचार हे सारे नाहीत फोल ।
Sanjay R.


Sunday, December 27, 2020

" शिकली सवरली मुलगी घरी "

शिकली सवरली मुलगी घरी
जीवनात तुमच्या काय न करी ।

उंच उडायाचे स्वप्न तिचे भारी
जुनाट विचारांची तोडेल दोरी ।

आनंद उत्साह सदा असेल दारी
जणू अवतरली स्वर्गातली परी ।

सुखी संसाराची गोष्ट ही खरी
जीवनात तुमच्या येतील सरी ।

अखंड लाभेल लौकीकाची वारी
शिकलेली मुलगी दुःख सारे हारी ।
Sanjay R.

Saturday, December 26, 2020

" अंधारमय जगणं "

झोपडीत एका 
संसार चाले ।
आयुष्यच सारे 
लक्त्तर झाले ।

फकीर मी काय
नशीबात आले ।
पैश्या शिवाय
कुठे काय चाले ।

कष्ट करूनही
भरेना हे पोट ।
सांगा भविष्य
आहे कुठे खोट ।

शिक्षण पाणी
मुलं अडाणी ।
डॉक्टर विनाच
चाले दवापाणी ।

गरिबाच्या घरची
हीच कहाणी ।
अंधारमय जगणं
मरण क्षणो क्षणी ।
Sanjay R.

Friday, December 25, 2020

" मन बेधुंद "

मन विचारांचा सागर
अपुरी पडेल ती घागर ।
श्वासागणिक बदलते रूप
दिवस रात्र चाले जागर ।

कधी क्षणात होई  बेधुंद
देई उत्साह थोडा आनंद ।
दुःखी कधी ते निर्विकार
होई अंतरात मग बंद ।

सुटता ताबा मनाचा
विपरीत तयाचे वागणे ।
ठेऊन भान मनाचे
होई सुलभ हे जगणे ।
Sanjay R.

Thursday, December 24, 2020

" ती "

सुंदर की अति सुंदर , काय म्हणू मी तिला. सौंदर्याची मलिकाच ती , सौंदर्यवती म्हणू तिला. रंग तिचा गोरा पान , डोळे जशे हरिणीचे, नाक सरळ गाल थोडे गोबरे, ओठ मधूघट जसे. बोलणेही अत्यंत लघवी वाटायचं बस बोलतच राहावं, कुणाही नवख्याला वाटावं बस बघतच राहावं.
पोशाख तिचा असला जरी साधा, शोभतो तिलाच तो तिच्यासाठीच असावा.

सूर्याच्या प्रथम किरणा आधीच ती उठायची. सूर्य डोक्यावर येईस्तो काम सारेच ती सम्पवायची.
दुपार तिची असायची आरामाची सायंकाळ मात्र फिरायची. फिरायला निघाली ती की, येणारे जाणारे लोक तिला न्याहाळायचे. सौंदर्य तिचे डोळे भरून बघायचे. सहजच शब्द दोन निघायचे, वाह अति सुंदर सारेच मनात म्हणायचे.

अस्त व्हायचा सूर्याचा त्या आधीच ती परतायची. घरात ती आहे की नाही कधीच कुणास ती नाही कळायची. मात्र सुर्योदयानंतरच ती परत दिसायची.
झाशीची राणी कधी भासायची. कधी स्वतःतच वावरणारी साधी सरळ जशी सवित्रीच वाटायची.
आज मात्र ती वाटत होती वेगळी. सुर्योदया आधीच तिची कामं आटोपली होती सगळी. काय विशेष असावं काहीच कळेना. चेहऱ्यावरचे भाव तिच्या कशाशीस जुळेना. बघत होती सारखी दूर त्या वाटेवर. घेत होती अंदाज दिसतंय कोण रस्त्यावर.
सारखे तिचे सुरू होते आत बाहेर जाणे. वाटेकडे बघून यायचे लक्षात हिरमुसणे.

आता मात्र तिची उत्कंठा होती वाढली . वाटेवरची नजर तिने नाही आता काढली. तेवढ्यातच एक आटो येऊन थांबला तिच्या दारात. मर्द मराठा सैनिक उतरला तिथे तोऱ्यात. ओवाळणीचे ताट घेऊन आली ती अंगणात . मर्दाला ओवाळताना हसत होती गालात .

पतीचं होता तिचा भारतीय सैन्यात. लग्न करून गेलेला पहिल्यांदाच येत होता घरात. बघून पोशाख त्याचा सैनिकाचा उर आला तिचा भरून , तोही गोड हसला स्यालुट तिला करून .

आता बाहेर निघताना एकटी ती नसायची. नवऱ्यासोबत फिरताना सारखी ती हसायची.
एक महिना गेला कसा कळलेच नाही कुणा.
परत आता एकटेपण सांगा काय तिचा गुन्हा .
घरदार सोडून तो जातो देशासाठी सीमेवर.
तरीही लवलेश नसतो दुःखाचा पत्नीच्या त्या मुखावर. पती जेव्हा असतो देशाच्या त्या सीमेवर. पत्नीही लढते इथे एकाकी त्या जगण्यावर .
कधी मधी येऊन जातात भाऊ बहीण नातेवाईक. मात्र लढते ति एकटीच होऊन स्वतःही सैनिक दुःख तिचे तिलाच ठाऊक.

डोळे असतात वाटेवर आणि कान टीव्ही वरच्या बातम्यांवर. सीमेवरच्या तणावाची बातमी ऐकून उठतो काटा मनावर . करते मग ती धावा देवाचा, म्हणते सुखरूप ठेव देवा कुंकू हे माझे. येईल जेव्हा दारी तुझ्या , फेडील नवस सारेच तुझे.

यावेळी मात्र दिलं देवानं एक वरदान. गर्भात तिच्या वाढू लागला अंकुर एक छान. बातमी आनंदाची पतीला तिने दिली. सीमेवरच होता तो सहजच म्हणाला , मुलगी आपणास झाली तर नाव ठेऊ या मिली. दोघनच्याही मनात नव्हता आनंद मावत. वाटतायचं त्याला कधी आत्ताच उठून जावे घरी धावत.

दिवसामागून दिवस गेले. लेकीचे पाय घरात आले.
कौतुक बघाया नव्हते कोणी. बाप तिचा सीमेवर लेक मात्र गुणी. मधेच बाप येऊन गेला. लेकीचे लाड करून गेला. नव्हते वाटत जावे परत. मात्र सुट्ट्या सम्पताच मनावर दगड ठेऊन गेला तो परत. वर्षातून दोनदा यायचा तो घरी. लाड कौतुक करायचा खूप, बघून आपली परी.

आई सारखीच सुंदर दिसायची त्याची ती मिली.बोबडे बोल बोलायची , जय भारत म्हणून स्यालुट जोरात करायची. बाबांचा तिच्या तिला होता अभिमान. देशाबद्दल मनात तिच्या भारीच सन्मान. हळूहळू मोठी होत होती लेक. मोठे झाल्यावर बाबांसारखेच सैन्य दलात जायचे स्वप्न तिचे एक.

दिवसामागून दिवस वर्षामगून वर्ष जात होते असेच. दृढ होत होता निश्चय ,आयुष्य आपले देशासाठीच द्यायचे. आणि सीमेवरून एक दिवस खबर आली  बाबा शहीद झाले. शेवटचा स्यालुट करत अश्रूपूर्ण नेत्रांनी स्वप्नपूर्तीचे आश्वासन बाबांना तिने दिले.
Sanjay R.







" चूल आणि मूल "

उरलेच कुठे आता 
ते प्राचीन आचार ।
चूल आणि मुल 
वाले सरले विचार ।


बरोबरीने माणसाच्या 
बघा कशी ती लढते ।
स्त्री नाही  कशातच 
उरली आता लाचार ।

नाही कुठेच मागे 
कुठल्याही शिक्षणात ।
सदैव तत्पर असते 
प्रत्येक नोकरी कामात ।

नेहमीच असते पुढे 
प्रत्येक अवघड कार्यात
नाव लौकिक तिचा 
आहे साऱ्या जगात ।

घर संसार असो वा 
असो मुलांचा सांभाळ ।
संपला आता तो 
जुन्या विचारांचा काळ ।

आहे भूषण समाजाचे
नाही तिला विराम ।
कर्तुत्वाला तिच्या आम्ही
करतो सारेच सलाम ।
Sanjay R.



Wednesday, December 23, 2020

" मी आणि तू "

मी आणि तू

मी.......
मी मी ची गर्दी इथे
हरवलो त्यात मी ।
सांगतंय कोणी तू
तोच का आहे मी ।
मि ला मी शोधतोय
आहे कुठे तो मी ।
बघतो अंतरात जेव्हा
मी तर आहे तोच मी ।

तू......
तू ला मी शोधू कुठे
तू इथे की तू तिथे ।
आहेस तू , तू जिथे
शोधले मी तुला तिथे ।
तू मनात तू ध्यानात
तू क्षणात तू कणात ।
तू तुझ्यात तू माझ्यात
आहे माझ्या तू हृदयात ।
Sanjay R.


Tuesday, December 22, 2020

" पडद्यामागचा बाप "

बाप घराचा आधार
उचले सारा भार ।
करून कष्ट अपार
करी उभा संसार ।
झेलतो सारे वार
मानतो कुठे हार ।
अव्यक्त ते  विचार
तीक्ष्ण लागे धार ।
वाटे करतो प्रहार 
अंतरात बंद सार ।
Sanjay R.

" छंद हा वेगळा "

काहूर मनात विचारांचे
मिळे शब्दांना आधार ।
छंद हा वेगळा किती
कविता जीवनाचा सार ।

शब्दच करी सारे व्यक्त
आयुष्य सुख दुःखाचा भार ।
डोळ्यात आसवांची गाथा
आणि देई लेखणी आकार ।

चकमक होता शब्दांची
तुटती सारेच विकार ।
हुंदका येई अंतरातून
शब्दपुढे शब्द लाचार ।
Sanjay R.


Monday, December 21, 2020

" काहूर उठलं पुन्हा "

थंडी सुरू झाली कशी
यात सांग कुणाचा गुन्हा ।
आठवण आली तुझी
नि काहूर उठलं पुन्हा ।
आहेस कुठे तू सांगना
माझा मीच झालो सुना ।
बघतो दूर  तिथे शुन्यात
घाव आहे कुठे तो जुना ।
Sanjay R.

Friday, December 18, 2020

" देऊ कसे सोडून सारे "

प्रवास हा जीवनाचा
देऊ कसे सोडून सारे ।
जीव छोटासा मुंगीचा
हट्ट किती जगण्याचा ।
कण कण गोळा करी
विचार कुठे मरणाचा ।
जीवन हे अनमोल किती
शोधू क्षण आनंदाचा ।
सारून दूर दुःख सारे
करू प्रयास हसण्याचा ।
बघ जरा तू दूर गगनात
ताप किती त्या सूर्याचा ।
दूर सरतो अंधार सारा
शीतल प्रकाश चंद्राचा ।
उठ मानवा जागा हो
सोड विचार जाण्याचा ।
Sanjay R.

Thursday, December 17, 2020

" दिव्यातली वात "

जळते जेव्हा दिव्यात वात
तेलाची असते वातीला साथ ।

करूनीया पुढे प्रकाश हात
 करतो कसा अंधाराचा घात ।

अशीच सरते आयुष्याची रात
उजेडाची काळोखावर मात ।

रात्र निघता मग होते प्रभात
चांदणी कशी ती होते अनाथ ।
Sanjay R.

Wednesday, December 16, 2020

" माझी कविता "

आठवण आली तुझी की
सुचतात मला शब्द ।
नसतीस तू सोबतीला तर
बसलो असतो ना स्तब्ध ।
प्रयत्न तर खूप करतो
माहीत नाही कसे हे प्रारब्ध ।
हवी तुझी साथ मला
तुझ्यातच व्हायचं मला मुग्ध ।
Sanjay R.

" क्षण चार आनंदाचे "

घ्या जगून 
दिवस चार हे जीवनाचे ।

धडपड जगण्याची
दिवस सारेच हे कष्टाचे ।

दिवस एक तो
येई आमंत्रण मरणाचे ।

उरेल मागे
सुटेल क्षण ते जगण्याचे ।

हवे मनाला
काहीच धागे ते उरण्याचे ।

सुख दुःख सोबती
वेचू चला क्षण आनंदाचे ।
Sanjay R.

" ती रात्र "

ती रात्र अंधाळलेली
गेली कशी मज कळलेच नाही ।
धुंद होती ती हवा,
मदहोश होते मन कळलेच नाही ।
रात्रीस बहरली रातराणी
दरवळलेला गन्ध कळलाच नाही ।
दोन भावनांचा मेळ
प्रणयाचा तो खेळ कळलाच नाही ।
सर्वस्व झाले एकरूप
बंधन कशाचे आता उरलेच नाही  ।
तू फक्त आणि मी
सत्य जीवनाचे कळले सारे काही ।
Sanjay R.




Monday, December 14, 2020

" आयुष्याची परीक्षा "

असतो रोज एक पेपर
जीवनाची हीच परीक्षा ।
सामोरे जायचे रोजच
गुणांची नसते अपेक्षा ।
सुख म्हणतात ते आहे कुठे
भोग भोगायचे हीच दीक्षा ।
जगण्यासाठी चाले सारे
घ्यायचे श्रम हीच शिक्षा ।
घेतो वेचून थोडा आनंद
उंच उडायचे ही अपेक्षा ।
Sanjay R.

Tuesday, December 8, 2020

" पार्वता "

पर्वता वय वर्षे असावे तीस बत्तीस. उंचीही मध्यम बांध्याची . अंग काठी तिच्या उंचीला साजेशी.  रंग काळा सावळा . केस तेल न मिळाल्याने थोडे पिंगट सोनेरी झालेले. नाक थोडे लांब आणि डोळे अगदी कोरीव वाटावे असे .  गालावर नेहमीच हास्य असणारी. तिला सुंदर अस म्हणता येणार नाही पण तिचा चेहराच असा की कुणालाही आकर्षित करेल असा.  तिचा नवरा म्हादू मात्र अगदीच वेगळा. वाटेल यान मागची आंघोळ कधी केली असेल , महिना तर नक्कीच झाला असेल . वयाचा अंदाजच येणार नाही असा. कृश झालेले शरीर. डोक्यावर केस वाढलेले. दाढी मिशी आडवी तिडवी वाढलेली आणि त्यातच त्याचा चेहरा लपलेला. अंगावर फटके कपडे  म्हणजे काय तर फटका पायजामा आणि फाटका सदरा. हात नेहमीच काळ्या वंगणाने भरलेले. त्याचा हा नेहमीचाच असा अवतार असायचा. पण कोणीही आवाज दिला की तो पुढ्यात हजर असायचा. सांगेल ते काम करायचा . आणि दिले तेवढे पैसे घ्यायचा. दुपारी पर्वता त्याची शिदोरी घेऊन यायची आणि म्हादू जेवण करून संध्याकाळ पर्यंत ते काम करायचा. मात्र सायंकाळी काम आटोपतच त्याला नकदी पैसे लागायचे. सायंकाळी मिळालेले सगळे पैसे तो दारूत घालवायचा. पैसे मिळाले की सरळ पार्ध्यांच्या बेड्यावर जाऊन खिशात असेल तेवढे पैसे पार्ध्यापुढे टाकायचा आणि वाटेल तेवढी दारू प्यायचा . आणि मग झिंग आली की बेड्यावरच कुठेतरी पडून रहायचा.  आणि मग रात्री केव्हा तरी पर्वता त्याला शोधत बेड्यावर यायची आणि त्याला  उठवून घेऊन जायची. तो तसाच मग जेवण न करताच झोपून जायचा. हा असा क्रम अगदी नेहमीचाच झाला होता.  घराचा सगळाच भार पर्वतावरच होता. लग्नाला दहा बारा वर्षे होऊनही घरात पाळणा हलला नव्हता. त्यामुळे घरात दोघे होते.
म्हदूचे आई वडील त्याच्या लहान पणीच साथीच्या रोगात गेले होते. पर्वताला तिची आई वडील भाऊ होते पण ते लांब दुसऱ्या गावात असल्यामुळे त्यांचे पण पर्वताशी जास्त सम्बन्ध येत नव्हता. त्यांनी तिचे लग्न करून देऊन आपले कर्त्यव्य पूर्ण केले होते. आणि ते पर्वताच्या बाबतीत बिनधास्त झाले होते. पर्वतानेही कधी आपल्या संसाराची वाच्यता आपल्या आई वडिलांकडे कधी केली नाही. कारण तिला माहिती होते की तिलाच आपला संसार चालवायचा आहे. आई वडीलही गरिबीतच जगत आहेत त्याना सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. उलट त्यांनी तिलाच दोष दिला असता की तिला तिचा नवरा व्यवस्थित सांभाळता आला नाही. माणूस सांभाळणं बाईच्याच हाती असते. भल्या बुऱ्याचा विचार दोघांनी मिळून करायचा असतो. त्यामुळे पर्वता आपल्या नशिबात असेच असेल म्हणून सारेच सहन करत होती.
नेहमीप्रमाणे आजही पर्वता सकाळी उठली. घरातले काम धाम ही सम्पले तरी म्हादू उठला नव्हता. तिने थोडे दुर्लक्ष करून स्वैपाकाची तयारी केली. तिचा स्वैपाक आटोपला तरीही म्हादू उठला नव्हता. म्हणून ती म्हादू जवळ गेली. आज का कामाले जाच न्हाय का म्हणत तिने म्हादू च पांघरून काढलं  तर म्हादू तसाच पडून होता. तिने त्याचा अंगाला हात लावला तर त्याचे अंग भयंकर तापत होते. तिने त्याला कडावर लोटले तरी तो काहीच हालचाल करत नव्हता. तिला मग मात्र घाबरल्या सारखे झाले. म्हादुचा स्वास मात्र चालू होता. तो मूर्च्छित झाला होता. ती तशीच घराबाहेर आली कुणाला तरी मदतीला बोलवावे म्हणून तिने आजूबाजूला कोणी दिसतो का ते बघितले दूर तिला म्हातारे तानाजी दिसले. तिने त्यांना आवाज दिला आणि घरात बोलवले. तानाजीने म्हादू ला बघितले तर तेही थोडे घाबरलेच. त्यांनाही काही कळले नाही की म्हादुला काय झाले असेल ते.
मग त्यानीच सुचवले याले डॉगतर कड न्या लागते बाई, पाय तू कस करते तं पर डॉगतर शिवाय काई होणार न्हाई. लवकर न्या लागते .  आणि तानाजी निघून गेला. तशी पर्वता विचार करतच बाहेर आली आता याले कसं न्यावं डॉगतर कड, डॉगतर त पाच कोस दूर रायते. गाडी घोडा पहा लागते पर त्याला बी पैसे लागन आन डॉगतरलेबी पसे द्या लागन मंग औशिध बी लागन त्याले बी पैसे पायजे. माया जोळ पाचशे हायेत तेच्यात होईन का सगळं. असा विचार करत करत ती रस्त्यावर आली. नशिबाने तिथे तिला पाटील भेटले. तेच बोलले काओ पर्वता आज कामाले न्हाई जाच का. म्हादू कुनकड गेला कामाले. मग तिने पाटलाला सगळं सांगितलं. तसं पाटलाने आटो वाल्याला आवाज दिला. अरे बाबू पाय बर म्हादू बिमार हाये त्याले घेऊन जाय डोकटर पाशी. भर सवाऱ्या लोकर लोकर न निंग पटकन्या. तसं आटोवाल्याने पटापट सवाऱ्या भरल्या आणि आटो म्हादू च्या घरापुढे आणला. लोकांनीच म्हादू ला धरून आटोत टाकला सोबत पर्वताही बसली. आणि ते डॉक्टर कडे पोचले. डॉक्टर ला पेशन्ट चा अंदाज आला त्यांनी पटापट दोन इंजेक्शन लावले आणि औषधींचा कागद लिहून म्हणाले. मी हे औषध देतो पण याचे लिव्हर खराब होत आहे. दारू पूर्ण बंद करा लागेल नाहीतर काहीच खरे नाही. इंजेक्शन मूळे म्हादू ला  होश आला होता. तो पर्वता कडेच टुकुर टुकुर बघत होता. तशी पर्वता त्याला म्हणाली पेत जाना दारू आन मंग मर असाच. तुले काय हाये. महाच नशीब फुटक. तुह्या पदरी पडली. कोणतं सुख देल तुन मले. आता तं मराले टेकला. तुह्या दारू पाई सगळा सत्यानाश झाला. चार पैसे बी न्हाई ठिवले तुन पदराले बांधून . आणि ती रडायला लागली.
तिचे रडणे आज म्हादू च्या काळजात पोचत होते. पण त्याच्याच्याने काहीच बोलणे होत नव्हते. तो तसाच शांत पडून पर्वता कडे बघत होता.

संजय रोंघे
नागपूर



" प्रवास "

चाले अखंड प्रवास
बघा या जीवनाचा ।
उगवतो सूर्य पूर्वेला
भ्रमनांती जाये पश्चिमेला ।
देऊन तो प्रकाश ऊर्जा
करी आमंत्रित रजनीला ।
होई प्रसन्न देवी निद्रा
चाले तप मग रात्रीला ।
चांदण्यांचे दीप हजारो
उजळती मग गगनाला ।
पहाट होता जागे सूर्य
निघे परत तो फिरतीला ।
Sanjay R.

Monday, December 7, 2020

" नको होऊ हताश "

होऊ नको हताश
चल पुढे जरा ।
विजय दारात आहे
वेळ करा वा मरा ।
दुःख सुखाची पायरी
येतो नशिबाचा फेरा ।
धैर्य नको तू सोडू
तुटेल कठीण तो घेरा ।
सुख येईल जवळ
जगण्याची ही तऱ्हा ।
Sanjay R.


Sunday, December 6, 2020

" बालपणातली मैत्री "

बालपण असतेच अनोखे
चाले दंग मस्ती मित्रांसंगे ।
ना कशाची चिंता न काम
खेळा पळा चाले फक्त दंगे ।
मैत्री बालपणातली मस्त
मग रोजच चालायचे पंगे ।
शाळा असोवा मैदान खेळाचे
मस्तीत असायचे सारेच चंगे ।
खायचे असो वा खेळायचे
वाटून घ्यायचे साऱ्या संगे ।
वाटत अजून यावेत दिवस ते
हवेत मित्रही तसेच लफंगे ।
Sanjay R.

Saturday, December 5, 2020

" तू स्वप्न परी "

तू स्वप्नातली परी
शोभते इंद्र दरबारी ।
सौंदर्याची मालिका
वेशभुषा भरजारी ।
चमचमते अलंकार
रत्न माणके भारी ।
भासे मज तू अशी
कोण कुठली नारी ।
रुणझुण करी पैंजण
आभास मनोहारी ।
नित्य बघावे तुज
होईल तीच वारी ।
लुटले हृदय माझे
वाट बघतो दारी ।
Sanjay R.

Friday, December 4, 2020

" मोडू नको रे सख्या "

मोडू नको रे सख्या
लग्नाचा हा बंध ।
लाव जीव थोडा
बघ येईल सुगंध ।

नव्हती ओळख 
कुठली पाळख ।
तरीही झाले रे मी
बघ तुझ्यातच धुंद ।

नको करू काळोख
होईल मी अंध ।
जडली रे प्रीत आता
तूच माझा आनंद ।
Sanjay R.

" मनात आशा "

जगतो ठेऊन मनात आशा
कुठे मिळेल कुठली दिशा ।

दिवस रात्र पळापळ नुसती
वाजतो कष्टाचा ढोल ताशा ।

ध्येय अंतिम काय कुणाचे
पैसा पैसा बस एकच भाषा ।

दिवस रात्री किती सरल्या 
उरल्या शेवटी काळ्या रेषा ।
Sanjay R.


Thursday, December 3, 2020

" नवी सकाळ नवी आशा "

रात्र होती स्वप्नांची
नकळतच सरली ।
पहाटेचा गजर झाला
झोपही मग हरली ।

उघडले डोळे जेव्हा
रात्र दूर जाऊन दडली ।
बघता दूर आकाशी
गाठ सूर्याशी घडली ।

परसात गुलाब फुलला
होती वेडावत लाली ।
चिवचिवत होते पक्षी
सांगे मज सकाळ झाली ।

मनोहारी स्वप्न माझे
आठवण तयाची आली ।
बघून स्वप्न साक्षात ते
पसरले हास्य गाली ।
Sanjay R.


Wednesday, December 2, 2020

" ट्वेन्टी ट्वेन्टी "

ट्वेन्टी ट्वेन्टी आले
कळलेच नाही कसे गेले ।
सगळेच होते घरात
वातावरण भीतीचे झाले ।

कोरोनाने केला घात
नोकरी धंदे बुडाले ।
हास्य मुखावरचे  कसे
पावलो पावली हिरावले ।

नाही शाळा नाही खेळ
मुलंही किती कंटाळले ।
ऑनलाईन ऑनलाईन
जीवनच कसे झाले ।

नको वाटतं आता सारं
पुरे वर्षच असेच गेले ।
देवा मिळू दे सुख आता
पहा वर्ष नवीन आले ।
Sanjay R.


Tuesday, December 1, 2020

" स्फोट "

शांतीच भंग पावली
स्फोटक हे वातावरण ।
होईल कधीही युद्ध
स्वस्तच झाले मरण ।
अनाचार हिंसाचार
मूल्यांचेही हरण ।
कळत नाही काहीच
कुठले हे चरण ।
शोधावेच लागेल आता
लागेलच ना सरण ।
Sanjay R.


Monday, November 30, 2020

" लगन बाबूचं जुडलं "

पस्तिशीले टेकला बाबू
जुडेच न्हाई लगन ।
सारेच होते कंटायले
समजे न्हाई करा का लागन ।

एक दिस गावात आले बुवा
होते मने पुरं, जो जे मागन ।
बाबू धरून बुवाचे पाय म्हने
मायराज होईन कवा लगन ।

लय फिरलो गाव गाव
सांगा काय करा लागन ।
बुवा म्हने बाबुले जाजो पूर्वेले
तिकडं नशीब तुह खुलन ।

फकस्त धा दिस थांब
मंग होईन तुह मिलन ।
हरिक झाला बाबुले 
म्हने होते आता लगन ।

चारच दिसात आले पावने
पोरगी पाहून जुयलं लगन ।
म्हने लय पावला मायराज
महा जमलं आता भजन ।

लयच खुश होता बाबू
ज्याले त्याला देये भाषन ।
तारीफ करे मायराजाची
म्हने किरपा त्यायचीच असन ।
Sanjay R.

Sunday, November 29, 2020

" कहाणी आसवांची "

नाही आयुष्याची कथा
आहे जीवनाची गाथा ।
कहाणी या आसवांची
ही जगण्यातली व्यथा ।

वनवासी झाला राम
ठरली गुन्हेगार सीता ।
घेतले उदरात शेवटी
धरती तिचीच माता ।

महाभारत घडले सारे
मान दौपदीचा रिता ।
वैकुंठाला पोचले सारे
रचल्या किती चिता ।

तीच भोगते दुःख सारे
किती विरोधी ही प्रथा ।
इतिहास या आसवांचा
झुकतो का इथेच माथा ।
Sanjay R.


Saturday, November 28, 2020

" कधी येशील परत "

आले आभाळ भरून

येशील कधी तू परत ।

वाट किती पहायच

दिवस आला सरत ।

मधेच गेला डोकावून
तळपता सूर्य आकाशात ।
घेतले धरेने न्हाऊन
उष्ण तीक्ष्ण प्रकाशात ।

आता येरे ये तू पावसा
पाहू नकोस रे अंत ।
शिणले रे डोळे सारे
कळला का तुज आकांत ।

बरस बरस तू रिमझिम
कर तप्त धरा ही शांत ।
गालात फुलव तू हास्य
सारेच होतील मग निवांत ।
Sanjay R.



Friday, November 27, 2020

" नजरानजर "

नजरेचा खेळ सारा
भावते जेव्हा मनाला ।
वाटे परत बघावे
बघतो वळून कुणाला ।

घेतो डोळ्यात भरून
कळते ते श्वासाला ।
थांबून सोडतो निश्वास
मन सांगते हृदयाला ।

वाटते परत दिसावे
ओढ लागते विचाराला ।
गुंतते मन तिथेच
फुटे पालवी प्रेमाला ।
Sanjay R.

Thursday, November 26, 2020

" थांग लागे ना मनाचा "

वाटे मनास माझ्या
क्षण व्हावा आनंदाचा ।
हास्य गाली असावे
लवलेश नको दुःखाचा ।

द्वेष उरात भरला
लागतो कोण कुणाचा ।
स्वार्थाचा धरून हात
नाही विचार जनाचा ।

जीवन हे अनमोल
नाही वेळ क्षणाचा ।
वाटे मज हवे सारेच
थांग लागेना मनाचा ।

लावा उधळून कुविचार
सद्भाव आहे गुणाचा ।
घेतो मीही जगून
तृप्त भाव या तनाचा ।
Sanjay R.


" मुंजा "

       माझे वडील आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्याचे निमित्ताने तहसीलच्या जागी आणि नंतर कॉलेज च्या निमित्ताने शहरात आलेत. त्यातच त्यांना नोकरी लागली आणि मग आम्ही शहरी झालो. पण आमचे दोन काका आत्या आणि इतर नातेवाईक अजूनही गावातच राहतात. घरी थोडी बहुत शेती असल्यामुळे आमचा गावाशी असलेला संबंध अजूनही कायम आहे. बाबा शेती निमित्ताने वारंवार गावाला जायचे. पण आता बाबांच्या पश्चात ती जवाबदारी माझ्यावर येऊन पडली. बाबांसारखेच आता मीही महिन्या दोन महिन्यांच्या अंतराने गावाला जात येत राहतो. आणि शेतीवर लक्ष ठेवतो. तसं शेतावर जाणं मला जास्त काही आवडत नाही पण जवाबदारी माझ्यावर येऊन पडल्यामुळे ती पार पाडण्याशिवाय माझ्या कडेही काहीच पर्याय नाही.

     आमचे गाव तसे छोटेच आहे. शंभर एक घरांची वस्ती असेल. शहारा पासून बरच लांब आणि मुख्य रस्त्यापासून जवळपास पाच किलोमीटर आत असेल आमचे गाव. पूर्वी मी लहान असताना आम्हाला गावाला जायचे म्हणजे फारच कठीण होते. गाडी , बस कशाचीच व्यवस्था नव्हती. मग गावाला जायला आमच्यासाठी बैल गाडी यायची, त्या बैल गाडीला रेंगी किव्वा दमणी म्हणायचे.  या रेंगी ला ऊन पाऊस लागू नये म्हणून चाट केलेले असायचे. आत बसायला गाडी टाकून नरम केले जायचे. जेणे करून जास्त झटके लागू नयेत.आता तशा रेंगी किव्वा दमणी या गाड्या दिसत नाहीत. माल वाहतुकीला वापरात येणारे खाचर किव्वा बैल बंडी मात्र अजूनही दिसते. वाहतुकीच्या त्या अव्यवस्थे मुळे सधन घरचीच मुले बाहेर जाऊन शिकायचे. गरीब मुलं मात्र शिक्षणापासून वंचित राहायचे. मात्र आता प्रत्येक गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. पण तरीही उच्च शिक्षण शहरात जाऊन घेण्या शिवाय पर्याय उपलब्ध नाही. आपल्याकडची गावं अजूनही शहरात मिळणाऱ्या सोईनपासून बरीच दूर आहेत. शिक्षण,  आरोग्य, बाजार व इत्यादी गोष्टींकरिता गावातल्या लोकांना शहरकडेच धाव घ्यावी लागते. तसेच इलेक्ट्रिसिटी, पाणी, मोबाईल, पक्की घरं, रस्ते, नाल्या व इतरही सोइ अजूनही गावांपासून बऱ्याच दूर आहेत. तशी गावात इलेक्ट्रिसिटी गावात पोचली आहे पण ती चोवीस तासात फक्त सात आठ तासच असते. केव्हा लाईट जातील याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे गावांचा पाहिजे तसा विकास झाला असे म्हणता येणार नाही. आणि बरेच लोक निरक्षर आहेत.या निरक्षरतेच्या कारणामुळेच ग्रामीण लोक अजुनही अंधविश्वास पाळतात. जादू टोणा, भूत खेत, मंत्र तंत्र, तोटके यावर त्यांचा खूप विश्वास आहे. अजूनही ते त्यातून बाहेर निघालेले नाहीत.  कोणी आजारी पडलं की मंत्रिकाकडून उपचार करून घेणारे बरेच लोक आहेत. पण कधी कधी ते ज्या काही गोष्टी सांगतात त्या अवश्वासनिय असूनही त्याची प्रचिती मात्र आपणासही अनुभवायला मिळते. त्यामुळे खरे आणि खोटे यातला फरक करणे कठीण होऊन जाते.

     आमचेही गाव आजही अशाच परिस्थितीत असलेले गाव आहे. शिक्षणाचाही अजूनही पाहिजे तसा प्रसार झालेला नाही. आत्ता आत्ता  आमच्या गावाला शाळेतील मुलांच्या सोईकरिता बस चे दोन टायमिंग दिलेले आहेत. मात्र पूर्वीप्रमाणेच बस च्या वेळा सोडून गावाला जायचे असेल आणि  जर स्वतःचे वाहन नसेल तर पाई पाईच पायपीट करत गावाला जावे लागते. रस्त्यात कोणी भेटला आणि त्याने जर लिफ्ट दिली तर ते तुमचे नशीबच म्हणावे लागेल.  आता गेल्या पाच सहा वर्षांपासून मी बरेचदा आपल्या बाईकने तर कधी कार ने आणि प्रसंगच पडला तर पाई पाई सुद्धा गावाला गेलेलो आहे. हंगामाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची शेतं हिरवी हिरवी झालेली असतात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात, पाण्याची सोय नसल्याने सगळी शेतं काळी काळी आणि मोकळी दिसतात. दिवसाच्यावेळी शेतात काम करणारे शेतकरी दिसतात पण अंधार होताच रस्ताही अगदी निर्मनुष्य होऊन जातो. रात्रीच्या वेळी पाई पाई गावाकडे जाणारा मीही कधी बघितला नाही. अति महत्वाच्या कामानिमित्त मात्र लोक आपल्या वाहनाने जातात येतात. पण तेही क्वचितच. सगळेच लोक नेहमीच्या सवयीनुसार अंधाराच्या अगोदरच आपल्या घरी पोचतात.  त्याबद्दल मीही कधी काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण मी अंधारात कधी आलो ते माझ्या गाडीनेच. पाई जाण्याचा प्रसंग कधी आला नाही.

     पण त्या दिवशी माझ्यावर तसा प्रसंग नेमकाच आला. सकाळी सकाळी रामभाऊ चा फोन वाजला , उद्या ला आपल्याला ते बंधी खचली त्याच काम करा लागते तुम्हाले या लागते मोज माप थोडी पहा लागन. तुमाले याच लागते. नाही तर काम होणार न्हाई. तुमचं असणं जरुरी हाये असा मेसेज देऊन त्याने आपला फोन बंद केला.  मी विचारात पडलो, कसे जायचे आता वेळेवर कारण कार सर्व्हिसिंग ला दिल्यामुळे कारने जाणे शक्य नव्हते. टू व्हिलर ने जायची इच्छा नव्हती आणि आता वेळही बराच झाला होता. पोहोचायला चांगलीच रात्र होणार होती. म्हणून मग मी माझे बाकी काम आटोपून बस ने गावाला जायला निघालो. बसने जायचे म्हणजे पाच किलोमीटर पाई जाणे हे होणारच होते. पण वाटलं बस लवकर मिळाली तर मी सायंकाळ पर्यंत बस स्टॉप वर पोचेल आणि मग कोणी तर गावाला जाणारा भेटला तर त्याच्या सोबत गावाला जाणे होऊन जाईल किव्वा कुणाला तरी गावातून फोन करून घ्यायला बोलऊन घेईल. तशी जास्त चिंता अशी काही वाटलीच नाही. पण नेमकं त्या दिवशी बस लेट लागली आणि मी बऱ्याच उशिरा आमच्या गावाजवळच्या बस स्टॉप वर पोचलो. अंधार झालेला होता. मला वाटले आता इथून गाव काय पाच किलोमीटर तर आहे, भेटेल कोणी तरी म्हणून चौरस्त्यावर थोडा थांबलो.  तिथली चहाची टपरीही बंद झालेली होती.  तो दिवस माझ्यासाठी काही वेगळाच असावा कारण मला गावाकडे जाणारा एकही व्यक्ती  तिथे दिसला  नाही. हळू हळू घडयाळीचा काटा पुढेच सरकत होता. रातकिड्यांचा आवाजही वाढलेला होता. कोणी येण्याची शक्यता वाटत नव्हती. कुणाला तरी फोन करून  बस स्टॉप वर बोलवून घ्यावे म्हणून मी फोन काढला तर फोन पूर्ण पणे डिस्चार्ज झालेला होता. आता माझ्या लक्षात आले की आज आपल्याला पाच किलोमीटर पाई जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तो विचार लक्षात येताच मला थोडी अस्वस्थता जाणवली पण परत मनातले धैर्य एकवटून मी निश्चय केला की चला आता पाई पायीच निघू या. अर्ध्या पाऊण तासात तर आपण घरी पोहचून जाऊ. मनातली भीती झटकली आणि मी तसाच एकटा पायपीट करत गावाकडे निघालो.

     गार गार वारा सुटला होता. मी आपल्याच मस्तीत कधी कुठल्याश्या विचारात कधी गाण्याचे बोल गुणगुणत गावाचा रस्ता पार करत होतो. अंधार मात्र खूप काळा असल्याचं जाणवत होतं. सहजच विचार आला आज चन्द्र कुठे लपला बा. कुठेच दिसत नाही. नंतर विचार आला कदाचित अमावसेचा काल सुरू असेल उशिरा निघेल कदाचित. परत मी आपल्या मस्तीत पाय उचलत राहिलो. जवळपास अर्धे अंतर चालून आलो असेल. तिथे शेतातच एक छोटंसं मंदिर असल्याचं मला माहित होतं. ते मंदिर अजून आलं नव्हतं. म्हणजे मी अजून अर्धे अंतर पार व्हायचे होते. तितक्यात दुरून मला ते पांढरे छोटे मंदिर दिसायला लागले. मंदिराचे पुढे दोन व्यक्ती पण असल्याचे दिसत होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज पण जाणवत होता. तरीही मला सहजच वाटून गेले की हे दोघे  इतक्या रात्री इथे कशाला आले असावे आणि तिथे थांबून काय करत आहेत. मी भराभर पाय उचलत मंदिराचे पुढे पोचलो तर तिथे तेव्हा कोणीच नव्हते. मला थोडे आश्चर्य वाटले. अरे आताच तर मी इथे दोन व्यक्ती बघितल्या होत्या, आणि आताच कुठे गेल्या. अंधारात कुठे लपल्या तर नाहीत. मला कदाचित अडवणार तर नाहीत, माझ्या जवळ असलेले पैसे हिसकून तर घेणार नाहीत. की ते आपल्याच गावचे असतील. कोण असतील. आता ते मंदिरात कशाला आले असतील. इतक्या रात्री कशाची पूजा असेल. असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. मनात थोडी भतीही वाटायला लागली. मी परत आजू बाजूला समोर मागे त्यांना अंधारात शोधण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच कोणीही दिसत नव्हते. अंधार आपले काळे कुळकुटे रूप दाखवून मला वेडावत होता. रात किड्यांचा आवाज वाढलेला होता. त्यातच आकाशातून फडफडत काही तरी गेल्याचे जाणवले. कदाचित तो पक्षी असावा. वर आकाशात चांदण्यांनी मला पुरते वेढून घेतले की काय असे वाटत होते. पण ती दोन माणसं मात्र कुठेच दिसत नव्हती. मी आवाज द्यायचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाजही निघत नव्हता, मी पुरताच घाबरलो होतो, शरीरातून त्या थंड हवेतही घामाच्या धारा लागल्या होत्या.भीतीही वाटायला लागली होती. पण धैर्य न हरपता मी मग तसाच पुढे गावाकडे चालत राहिलो. पाठीमागे मात्र परत वळून बघायची हिम्मतच होत नव्हती. मग मी तसाच चालत राहिलो. मला घरा शिवाय काहीच दिसत नव्हते. आणि ते अजून किती दूर आहे याचा अंदाज येत नव्हता. सारखे घर केव्हा येईल केव्हा येईल असे वाटत होते. घर येता येत नव्हते. मी मात्र आपल्याच तंद्रीत चालत होतो. शेवटी मला माझे गाव दिसायला लागले. तेव्हा माझ्या जीवात जीव आला.  घरी पोचलो तर सम्पूर्ण गाव शांत वाटत होते. मी तसाच मग हातपाय धुवून कॉटवर आडवा झालो. आणि डोळे बंद करून पडून राहिलो. हळूहळू माझे मन शांत झाले आणि मग माझे मलाच हसायला आले. खरच मी ही इतरांसारखाच घाबरट आहे असे वाटले. घर येई पर्यँन्त माझ्या शरीरातील त्राणच गेल्याचे वाटत होते. मंदिरा पासून तर घरा पर्यंत मी कसा पोचलो काहीच आठवत नव्हते. त्यावेळी मला फक्त घरच दिसत होते. सगळे भान हरपले होते. मग सगळी भीती झटकून मी उठलो. कपडे चेंज केले आणि सोबत आणलेला टिफिन फस्त केला. थोडं अंगणात जाऊन फिरून घेतलं. वर आकाशात चांदण्या टीमटीम करत मला पाहून हसत आहेत की काय असे वाटत होते. थोडा वेळ तसाच चांदण्या बघत राहिलो. मग मात्र हळळू डोळ्यात झोप आपला रंग दाखवायला सुरू झाली होती. मग मी घरात जाऊन दार आतून घट्ट बंद केले आणि झोपी गेलो. कारण सकाळी लवकर उठून माणसं गोळा करून कामाची सुरुवात करायची होती. बेडवर आडवा होताच झोप केव्हा लागली ते कळलेच नाही.

     सकाळी लवकरच जाग आली. रात्रीचा प्रसंग आठवत मी ब्रश करायला म्हणून बाहेर आलो तर रामभाऊ दारात हजरच होता. तो म्हणाला बापू केव्हा आले राती त मी पाहून गेलो, तुम्ही नोहते. मले वाटलं तुमि आता सकाईच यान पर तुमि त रातीच आले वाटते. गाडी दिसत न्हाई तुमची. पायदलच आले का जी. मले फोन केला असता त म्या सुराशाले धाडलं असत ना बस स्टॉप वर तुमाले घ्याले. इतक्या राती कहाले ऐकलेच पैदल पैदल आले जी. मग मी त्याला रात्रीचा घडलेला प्रसंग सांगितला तर तो म्हणाला बराबर हाये बापू, कालची अमावस नोती काजी, तुमाले त्यानं दर्शन देल्ल जी. नशीबवान हात तुम्ही. बरं झालं तुमचं दर्शन झालं. आजी तुमाले सांगतो आपल्या गावात लय लोकायले दर्शन देल्ल जी त्यानं पर अजून पावतो कोनालेच तरास न्हाई देल्ला.

आजी तेथ मुंजा देव हाये म्हनते. म्हुनच त्या वावर वाल्यानं तिथं मुंजा देवाचं मंदिर बांधलं. लय जुनं मंदिर हाये थे. शंभरक वर्स झाले अस्तिन नाई त जास्त बी झाले अस्तिन आता. पर अजून कोनाले कोनताच धोका झाला न्हाई. गावाची थे राखनच करते म्हना नं. तुम्ही काई कायजी करू नोका. चांगलाच संकेत हाये थो. तुमचं काई चांगलं व्हाचं असन मुन तुमाले दर्शन देल जी.  तुमि आंघोळ करा एक उदबत्ती देवाजवळ लावा आन हात जोडा. आन मंग या वावरात. मी आनतो मानस बोलावून. डायरेक वावरातच भेटू आता,  मी पोचतो तिथंच असे म्हणून रामराव निघून गेला आणि मी ही आपली तयारी करायला लागलो.
संजय रोंघे
नागपूर


" कधी संपेल ही रात्र "

जगतो तुझ्या आठवणीत
कधी संपेल ही रात्र ।
चेहरा तुझाच दिसतो
मिटत नाहीत नेत्र ।

आठवतात शब्द तुझे
बोल गुणगुणतात कानात ।
मलाही खूप सांगायचे 
आहे किती या मनात ।

वाटत हसावं खळखळून
सारून दुःख सारे दूर ।
सांगू कसे मी तुजला
अंतरात भावनांचा पूर ।

कुठे कशी सांग एकदा
शोधतो मी तुलाच ।
सम्पव ही रात्र आता
हवा सूर्यही मलाच ।
Sanjay R.


Wednesday, November 25, 2020

" स्वप्न उजेडाचे "

बघतो जेव्हा मी आकाशात

बदलतात रंग कधी निळेकाळे ।

चाले मुक्त विहार ढगांचा
अखंड प्रवास त्यात सूर्याचा ।

दडतो जेव्हा सूर्य क्षितिजा आड
टीमटिमतात चन्द्र तारे नभाआड ।

नजाणे जातो कुठे तो प्रकाश
पगटतो अंधार घेऊन रूप काळे ।

वाटते जाऊन लावावा दीप एक
उजळावे आकाश सारे अंधारात ।

वाटे मज करावा अंधाराचा नाश
का धारेवर होईल तेव्हा प्रकाश ।
Sanjay R.



Monday, November 23, 2020

" प्रेम जीवनाचा आधार "

नसतात विचार 
कुठले आचार ।
असूनही डोळे 
दिसत नाही काही ।

प्रेमाचं वारं
कळतं सारं ।
कळूनही मात्र
मन ऐकत नाही ।

अशांत मन
कठीण क्षण ।
भिर भिर नजर
शोधी दिशा दाही ।

आधार सुखाचा
आनंद जीवनाचा ।
सांगा प्रेमा विना 
आहे कुठे काही ।
Sanjay R.

Saturday, November 21, 2020

" साईड इफेक्ट लग्नाचे "

लग्नाचे कुठे असतात
साईड इफेक्ट्स ।

सुरळीत चालतो संसार
नसेल जर डिफेकट्स ।

प्रेम आदर आणि विश्वास
हेच होतात रिफ्लेक्ट ।

होते आयुष्य सुखाचे
कुणा करू नका निगलेक्ट ।
Sanjay R.


Friday, November 20, 2020

" कशी गं तू आजी "

कशी गं तू आजी
हसत नेहमी असतेस ।
आजी झाली गं तू
पण म्हातारी कुठे दिसतेस ।

बोलणं तुझं गोड गोड
माया किती करतेस ।
रागावत नाही कधीच
सारखी माझ्याकडेच बघतेस ।

लागता मला थोडही
काळजी किती तू करतेस ।
स्वतःच्या वाट्याच सारं
मलाच गं तू देतेस ।

करमत नाही तुझ्या विना
अंतरात माझ्या वसतेस ।
बंध हा नात्याचा गं
किती गं तू जपतेस ।
Sanjay R.


Thursday, November 19, 2020

" थंडी म्हणते मी "

     डिसेंम्बर महिना म्हणजे थंडीचा महिना. शाळांना पण ख्रिसमस च्या सुट्या असतात. दिवाळी नुकतीच झालेली असते. परीक्षा आटोपलेल्या असतात. आणि नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन वाट बघत असते. सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण असते. निसर्गही मनसोक्त बहरलेला असतो. रंगीबेरंगी नाजूक फुलं लाजत मुरडत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. फुलांचा सुगन्ध चाहुओर दरवळलेला असतो.

     त्यातच आमच्या चिंगी ला पिकनिकला जायचे सुचले. तिच्या सगळ्या मैत्रिणी पिकनिकला जाणार होत्या. त्यांच्या त्या गोष्टी ऐकून तिलाही राहवत नव्हतं. तिने मग हट्टच धरला आपणही पिकनिक ला जायचे. पण ही पिकनिक एक दिवसाची नाही तर चांगली सात दिवसांची हवी असे तिचे म्हणणे होते. मस्त बाहेर ट्रेन ने जायचे , सात दिवस बाहेरच राहायचे, हॉटेल मध्ये पाहिजे ते खायचे मस्त भटकायचे. फक्त मस्ती करायची. पण मग अगदी वेळेवर सात दिवसांचा टूर अरेंज करायचा म्हणजे साधं नव्हतं. पण चिंगी ऐकायलाच तयार नव्हती. जायचं म्हणजे जायचं. आणि न ठरवता जायचं म्हणजे त्यातही एक थ्रिल असत. असं तिचं म्हणणं होतं. मग मात्र आम्ही ही तयार झालो. कुठे जायचे हे मात्र काही ठरत नव्हतं. आता वेळेवर तिकीट, रिझर्वेशन सगळाच गोंधळ होणार होता . चिंगीला मात्र हा असाच गोंधळ हवा होता. ठरवून तर काहीही करता येईल. पण न ठरवता पण काही करू या, ही तिची इच्छा होती.

     तसेच मग आम्ही आमची तयारी सुरू केली. मी ट्रेन च्या तिकीट करिता नेट वर साईट उघडून बघितले तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्वच दिशेने जाणाऱ्या ट्रेन मध्ये फुल चे टॅग लागलेले होते. काय करावं, कुठे जावं, काहीच सुचत नव्हतं. शेवटी मद्रासकडे जाणाऱ्या ट्रेन मध्ये थोडी आशा वाटत हाती कारण वेटिंग नुकतेच सुरू झालेले होते. त्यात वेटिंग चे तिरुपती ला जायचे तिकीट मिळण्याचे चांसेस होते. तसे मी चिंगीला विचारले, आपण तिरुपती मद्रास ला गेलो तर तुला आवडेल का. तर ती म्हणाली अरे पप्पा तिकीट कुठलंही काढा , बस आपल्याला इथून निघायचं आणि फिरून परत यायचं बस इतकंच लक्षात घ्या. मग मी तीन तिकीट तिरुपतीच्या बुक केल्या. ट्रेन दुसऱ्या दिवशी होती सायंकाळी पोचणार होती. नेमकं आमच्या नशिबाने  तिकीट सहा तासात कन्फर्म झालं आणि आमची चिंता थोडी कमी झाली. मग आम्ही विचार केला की बालाजी चे दर्शन करून मग मद्रास जायचे. दोन दिवस मद्रास ला थांबून मग परत निघायचे. त्यानुसार मी मग मद्रास वरून रिटर्न तिकीट शोधायचा प्रयत्न केला तर तिथे पण तीच परिस्थिती होती. कमी वेटिंग असलेल्या ट्रेन मध्ये मी वेटिंग चे रिझर्वेशन घेऊन मग तो विषय सम्पवला. आणि आम्ही तयारीला लागलो.
    
     जायचे तिकीट कॉन्फर्म झाल्या मुळे आम्ही आरामात तिरुपती ला पोचलो. पण निघताना आमची एक फार मोठी गडबड झाली. स्वेटर, शाल आणि इतर थंडी पासून बचाव करायचे कपडे असलेली ब्याग आमची घरीच सुटली. आता मात्र लक्षात आले की आपली ही ट्रिप खरच चिंगी जसे म्हणत होती तशीच थ्रिलिंग होणार होती. थंडी पासून बचावाचे सगळेच कपडे असलेली ब्याग घरातच आमची तिला उचलायची वाट बघत होती.
आम्ही पोचलो तेव्हा अंधार पडलेला होता. मी हॉटेल चा शोध घ्यायला लागलो तशी चिंगी बोलली पप्पा इथे काय थांबायचं. चला आपण मंदिरलाच जाऊ या, लवकर दर्शन होईल आणि मग आपण फ्री होऊ म्हणजे मग आपल्याकडे फिरायला बराच वेळ असेल . सो आम्ही मग जेवण आटोपून मंदिराकडे निघालो वर गेल्यावर कळले की आता एन्ट्री बंद करण्यात आलेली आहे. आता सकाळी एन्ट्री सुरू होईल. मग मात्र थांबण्याशिवाय पर्याय नव्हता तशातच रात्रीचे दोन वाजले होते. एन्ट्री सुरू व्हायला अजून चार तास बाकी होते. मी हॉटेल शोधायचा प्रयत्न केला पण सगळेच हॉटेल्स फुल झालेले होते. प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल्स फुल झाले होते. शोध घेऊनही कुठेच काही मिळाले नाही. थंडीचा जोर तर खूपच वाढलेला होता. हात पाय थरथरत होते. दात नुसते हलत होते. गर्दीही भयंकर होती. लोक खुल्या जागेत घोळके करून बसलेले होते. सगळ्यांची परिस्थिती वाईट दिसत होती. थंडीमुळे लोक शाल, ब्लॅंकेट लपेटून चहाचा आस्वाद घेत बसलेले होते. त्यांचे ते लपेटलेले शाल ब्लॅंकेट बघून मात्र आम्हाला थंडी जास्तच झोंबत आहे असे भासत होते . जणू ती आम्हाला अजूनच वेडावत आहे असे वाटत होते. मग मी ही एक चहावाला शोधला आणि त्याच्या भट्टीच्या बाजूला जाऊन आम्ही बसलो आणि अगदी कडक चहाचा एक एक घुट घेत थंडीमे गर्मीका येहसास शोधत होतो. कारण आता आमच्याकडे तोच एक पर्याय बाकी होता.

     आजूबाजूला अश्याच चहाच्या भट्ट्या पेटलेल्या होत्या. त्यांच्या निघणाऱ्या ज्वाळा आम्ही आपल्या डोळ्यातून आत शरीरात पोहचऊन गर्मी चा एक आभास निर्माण करून स्वतःचा बचाव करण्याचा तुटका फुटका प्रयत्न करत होतो. थंडीने आपले थ्रिल निर्माण केले होते. आणि आम्ही त्या थ्रिल मध्ये पुरते गरगर फिरत होतो. वारंवार नजर घड्याळाकडे जात होती. सकाळ व्हायला किती वेळ बाकी आहे याचे कॅलकुलेशन वारंवार करत होतो.  वेळही अगदी निवांतपणे शांत चित्ताने संथ गतीने पुढे सरकत होती. आणि थंडी आपल्या वर्चस्वाची आम्हास जाणीव करून देत होती. त्या चार तासात आम्ही किती वेळा चहा घेतला याचा काहीच हिशोब नव्हता. बस आमच्याकडे तोच एक पर्याय उरलेला होता.

     मग हळूच चिमण्यांची चिवचिव सुरू झाली हळू हळू अंधार लुप्त व्हायला लागला आणि आमची थंडीशी रात्रभर चाललेली लढाई ही संपुष्टात येत होती. तसे मग आम्ही अंघोळीची व्यवस्था शोधून तिथे आंघोळ फ्रेश होऊन दर्शनाच्या रांगेत पोचलो. श्री बालाजी चे दर्शन करून मग आम्ही मद्रास कडे रवाना झालो, तीन दिवस मद्रासला फुल एन्जॉय करून परत आलो. तो पर्यंत आमचे रिटर्न तिकीट ही कन्फर्म झालेले होते, त्यामुळे बाकी प्रवास सगळा मस्त आनंदात उत्साहात पार पडला. पण थंडीचा हा गार झटका मात्र आम्ही कधीच विसरणार नाही.चिंगी मात्र या पिकनिक मुळे जाम खुश झाली होती.

संजय रोंघे
नागपूर.



Wednesday, November 18, 2020

" टाईपरायटर "

गेले ते दिवस केव्हाच
आता ऑफिसच बदलले ।
खडखडायचे टाईप रायटर
आवाज सारेच विसरले ।

आला कॉम्प्युटर चा जमाना
ऑफिस झालेत सुने ।
टाईप रायटर पेन फाईल
सगळेच झाले जुने ।

स्टेनो पण आता हटले
हातात मोबाईल आले ।
रेकॉर्डिंग फोटोग्राफी
सगळेच किती इझी झाले ।

भार कामाचा हलका झाला
करा वर्क फ्रॉम होम ।
घरबसल्या होते सारेच
टेक्नॉलॉजीने कामात जोम ।
Sanjay R.


" सेल्फी "

थोडंच अगोदर बघा
आपण होतो कुठे ।
फोटो काढायला होते
स्टुडिओ मोठं मोठे ।

डोळे दिपायला असायचे
प्रकाशाचे लाईट तिथे ।
फोटोग्राफरने रेडी म्हणता
हसायचे थोडे खोटे ।

आजकाल आले मोबाईल
काढलं सेल्फी जिथे ।
वेळ नाही काळ नाही
फोटो बघा त्वरित भेटे ।

रेडी व्हायची गरज नाही
नेहमीच सारे तयार इथे ।
सेल्फी काढा करून जरा
वेडे वाकडे तोंड मोठे ।
Sanjay R.

Monday, November 16, 2020

" प्रवास अखंड जीवनाचा "

चाले अखंड प्रवास
मुक्त या जीवनाचा ।
सुर्योदय ते सूर्यास्त
प्रकाश असतो सूर्याचा ।

होता रात्र अंधारी
भरे दरबार चांदणीचा ।
घेता निशा रूप वेगळे
सत्कार होई चंद्राचा ।


दूर वाजती ढोल नगारे
आवाज रातकिड्यांचा ।
घेऊन मशाल हाती निघे
जत्था मग काजव्यांचा ।

अनोखे ते दृश्य आगळे
फुले मोगरा रात्रीचा ।
दरवळ चाले धरेवरती
हसऱ्या त्या रातरणीचा ।

येता जाग मग सूर्याला
क्षण असे तो पहाटेचा ।
सारेच जाती दूर कुठे ते
होतो उदय उजेडाचा ।
Sanjay R.

" रम्य दिवस ते कॉलेजचे "

अजूनही आठवतात हो मला
रम्य दिवस ते कॉलेजचे ।
कॉलेज सरले नोकरी आली
चाळतो पाठ जीवनाचे ।

हसायचे आणि खेळायचे
कधी बिनधास्त भटकायचे ।
मित्र असायचे संगतीला
पाठीराखे तेच जीवनाचे ।

गाडा संसाराचा येता हाती
सैल झाले नाते मैत्रीचे ।
आठवण मात्र निघत नाही
अस्तित्व मनात मित्रांचे ।
Sanjay R.


" भाऊ बहीण "

भाऊ आणि बहीण

नाते आहे रक्ताचे ।


प्रेमाचे आणि भावनांचे

बंध आहेत जीवनाचे ।


बांधून धागा प्रेमाचा

पाठीशी ती असण्याचे ।


खोटे मोठे कधीतरी

भाव दाखवी रुसण्याचे ।


वाट पाहते भावाची

निमित्य असते दिवाळीचे ।


जपते आपल्या भावाला

निभावते कर्तव्य आईचे ।

Sanjay R.


Sunday, November 15, 2020

" दिवाळी बळीराजाची "

सगळेच म्हणतात मला
आहेस तू बळीराजा ।
भोगतो मात्र दुनियेची
दुःख हीच माझी सजा ।

फाटक तुटकच नशिबात
राहतो नेहमी अंधारात ।
अख्ख आयुष्य गेलं बघा
निरंतर असतो कष्टात ।

आडोशाला भिंती चार
वर फाटक तुटक छप्पर ।
शिक्षण पाणी पण शून्य
पोरही निघाले सारे टिप्पर ।

आशा मात्र सुटत नाही
उपसतो कष्टाचा डोंगर ।
एकच पाऊस देतो धोका
फिरते मेहनतीवर नांगर ।

लुटारू तर सांगू किती
खिसा भरतो व्यापारी ।
कर्ज काढूनच जगतो मी
झकास चालते सावकारी ।

राजकारण्यांच काय सांगू
देऊन जातात आश्वासन ।
शेतकऱ्यांचा नाही कोणी
काय करते सरकार पन ।

रडत फडत जातो दिवस
कुठला आला दिवाळ सण ।
नशीबाचाच फेरा आहे
हेच आमचे जीवन मरण ।

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल -8380074730


Friday, November 13, 2020

" एक किरण उजेडाचे "




दिवस येता दिवाळीचे
लोट वाहती आनंदाचे ।
हेच ते क्षण असतात
सुख आणि समृद्धीचे ।

एकच किरण उजेडाचे
साम्राज्य सरते अंधाराचे ।
प्रज्वलित होता दीप हजारो
स्वातंत्र्य हरते कळोखाचे ।

उगम होतो उत्साहाचा
विसर पडते दुःखाचे ।
जगून घेतो माणूस असे
हेच क्षण ते जीवनाचे ।
Sanjay R.

Thursday, November 12, 2020

" क्षण कुठला कसा "

क्षण कुठला कसा
नाही कुणास ठाव ।
जगतो प्रत्येक क्षण
मनात मात्र हाव ।

चाले आयुष्यभरच मग
नुसती धावाधाव ।
पैसा पैसा करत जगतो
कशाला हवे मोठे नाव ।

निघून जाते वेळ कशी
मग उरते काय राव ।
विचार थोडा करुनिया
वेळ सत्कारणी तू लाव ।

लाभेल तुज थोडी शांती
करू नकोस रे घाव ।
ऐश्वर्याचा होशील धनी
कळेल तुलाच प्रभाव ।
Sanjay R.