कुठला कशाचा एकांत
वाटतो मला तो अंत ।
असंख्य विचार येती जाती
मन कुठे असते हो निवांत ।
नको नको ते मग सुचते
वाटते माझी मलाच खंत ।
माणसांच्या घोळक्यात बरा
नाहीच व्हायचे मला संत ।
मित्र मैत्रिणी हवेत सारे
नकोच हो मला तो एकांत ।
Sanjay R.
मनात उद्याची आशा
घालवू कशी निराशा ।
वाट दूर ही जाते कुठे
कळेना कुठलीच दिशा ।
स्वप्न जेव्हा मी बघतो
असते वेगळीच नशा ।
वास्तवात कळती मज
मिटलेल्या पुसट रेषा ।
का चाले वणवण सारी
सरेल कधी मनाची तृषा ।
भोग भोगतो मी जन्माचे
लुप्त होईल सारी आशा ।
Sanjay R.
हात गुंतले कामात
मुख हे हरी नामात ।
डोळे शोधती विठ्ठल
आस दर्शनाची मनात ।
दूर इतका तू पंढरी
जावे वाटे मज क्षणात ।
धारूनिया पाय तुझे रे
अर्पावी आसवे चरणात ।
आठवण येण्यास सदा
ठेव मजसी तू दुःखात ।
Sanjay R.
विचारांचा गुंता सारा
नजरेत होता आदर्श ।
तयारच नव्हते मन
अंतरात चालला संघर्ष ।
सुख बघितले कुणाचे
झळकला मुखावर हर्ष ।
दुःखाच्या वाटे वरती
जाणवेना कुठला स्पर्श ।
थिजली नजर डोळ्यात
काळोखात कुठे दर्श ।
जगतो जीवन कसा मी
लोटतो एक पुढे वर्ष ।
Sanjay R.
पोटासाठी फिरतो वणवण
शहर कुठले हो माझे ।
गरिबांचा संसार असाच
वाहतो जगण्यासाठी ओझे ।
वर बघतो आकाशात
वाटते किती ते खुजे ।
दिवसही मोजत नाही
घडतात आपोआप रोजे ।
Sanjay R.