Tuesday, February 4, 2020

" गरीब आमचे गाव "

गरिबी जिथे वसते
ते असते गाव ।
सुविधांचा तर असतो
नेहमीच तिथे आभाव ।

मोडक्या तोडक्या जागी
जमिनीवर चाले शाळा ।
मास्तर नाही आले तर
उघडतच नाही ताळा ।

नाही डॉक्टर दवाखाना
गळा पकडतो आजार ।
गरज पडली तरी बघा
नसतो कशाचा बाजार ।

फाटकं तुटकं घालायचं
कसं तरी पोट भरायचं ।
दिवसभर शेतात काम
मरेस्तोवर करायचं ।

थंडी असो वा पाऊस
आडोशाला निजायचं ।
सरेल दिवस तेव्हा ना
चटकन तसच मरायचं ।
Sanjay R.

" ओळख अनोळखी झाली "

ओळख तुझी माझी
बघ जुनी किती ती
अनोळखी आता झाली ।

मान बाजूला करून तू
आजच दूर तू
का ग अशी निघून गेली ।

आठव तो दिवस परत
होता नजरानजर जेव्हा
काळीज तू घेऊन गेली ।

मोह परत बघण्याचा
सांगून मनास माझ्या
ओढ किती तू लावून गेली ।

मनात भावना माझ्या
व्याकुळ अजूनही तशाच
साऱ्याच उलथून गेली ।

लावू नको परत आता
हुरहूर या जीवाला
पालवी प्रेमाची सरून गेली ।
Sanjay R.

" कशी ही अंधश्रद्धा "

श्रद्धा हीच आमची
या जीवनाचा पाया ।
अंधश्रद्धा आमची
जाते जीवन वाया ।

श्रद्धे विना काय उरते
पुढ्यात मोह माया ।
राग लोभ द्वेष मत्सर
अंतरातल्या छाया ।

पळापळ चाले नुसती
थांबते कुठे काया ।
सारून दूर जायचे
सुखी जीवन कराया ।
Sanjay R.

Friday, January 31, 2020

" झाला गाव सुना कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई फेब्रुवारी 2020 अंकात माझ्या " झाला गाव सुना " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" सांगा कोणी निरोप माझा "

स्वप्न नकळत येतात
देऊन आनंद जातात ।
कुणी सांगा निरोप माझा
ठेऊ किती मी मनात ।

सागर विचारांचा भरला
मावेना आता अंतरात ।
मन करून आज मोकळे
विहरायचे मज अनंतात ।

प्रतीक्षा वाटे नको आता
घे सामावून मज तुझ्यात ।
दिसणार नाही तुला रे
थेंब आसवांचा डोळ्यात ।
Sanjay R.