Friday, January 31, 2020

" झाला गाव सुना कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई फेब्रुवारी 2020 अंकात माझ्या " झाला गाव सुना " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" सांगा कोणी निरोप माझा "

स्वप्न नकळत येतात
देऊन आनंद जातात ।
कुणी सांगा निरोप माझा
ठेऊ किती मी मनात ।

सागर विचारांचा भरला
मावेना आता अंतरात ।
मन करून आज मोकळे
विहरायचे मज अनंतात ।

प्रतीक्षा वाटे नको आता
घे सामावून मज तुझ्यात ।
दिसणार नाही तुला रे
थेंब आसवांचा डोळ्यात ।
Sanjay R.

Thursday, January 30, 2020

" बघू किती मी वाट "

नशीबातच माझ्या आहे
फक्त वाट पाहणं ।
ताटकळत बसायचं
उघडून डोळ्याचं पापनं ।

मनात वादळ विचारांचं
लागते श्वासांना धाप ।
कधी कधी तर होतो
अंतरात थरकाप ।

नको वाटतं आता
वाट कुणाची बघणं ।
स्वछंद कसं असत
बघावं ते जगणं ।
Sanjay R.

" कसे व्हायचे महान "

व्हायचे असेल महान
करून घ्यायचा सन्मान ।
योग्यता असो नसो
बस ठेवायचे स्वतःचे ध्यान ।

मी मोठा मी मोठा करत
मिळवायचा आपलाच मान ।
ओळखतात लोकं सारे
हे मिरवणुकीतलं निशान ।

स्वतःच्या स्वार्थापाई
होतो कसा तो बेभान ।
बुद्धी शुद्धी नसतेच त्याला
मिरवतो सारे ठेऊन गहाण ।

हिरा खरा दूरच असतो
असतो त्याला आत्मसम्मान ।
अंधारातही चमचमतो हिरा
त्याची तर अलगच शान ।
Sanjay R.